कथारुप यशवंतराव-विभाग तिसरा-यमुनाकाठ-एका व्यक्तीला विचारले पाहिजे !

विभाग तिसरा - यमुनाकाठ

( १९६२ - १९८४ )

एका व्यक्तीला विचारले पाहिजे !      

६ नोव्हेंबर १९६२ रोजी यशवंतराव सचिवालयात बसून फायली हातावेगळ्या करीत होते. इतक्यात त्यांच्या सहाय्यकाने घाईघाईने येऊन सांगितले, ' पंतप्रधानांना तुमच्याशी बोलायचे आहे. लवकरच त्यांचा फोन येईल. ' लगेच फोन वाजला. यशवंतरावांनी फोन उचलला. पंडितजींचे शब्द त्यांच्या कानावर आले, ' मी जवाहरलाल बोलतोय. आजूबाजूला कोण बसलेले नाही ना ?'

' कोणीही नाही.'

' एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला विचारायची आहे. तिची वाच्याता कुठेही होऊ देऊ नका. मला फक्त ' हो ' किंवा ' नाही' एवढेच उत्तर द्या.' यशवंतरावांनी गुप्ततेची हमी दिल्यावर पंडितजी म्हणाले, ' तुम्ही आता दिल्लीला आले पाहिजे असे मला वाटते. येणार का तुम्ही ?'

या अनपेक्षित प्रश्नाने साहेब स्तब्ध झाले. यशवंतरावांचे मौन ओळखून नेहरू म्हणाले, ' तुम्ही आत्ताच उत्तर द्या, असा आग्रह नाही. विचार करून दोन दिवसांत सांगितले तरी चालेल पण कोणाशीही या विषयी बोलू नका.'

यशवंतराव म्हणाले, ' निदान एका व्यक्तीशी तरी मला बोलले पाहिजे.'

किंचित रागावलेल्या स्वरात पंडितजी म्हणाले, ' अशी कोणती व्यक्ती आहे, जिच्याशी तुम्हाला याबद्दल बोलावेच लागेल ?'

' मुंबई सोडून दिल्लीला यायचे , तर मला निदान माझ्या पत्नीशी तरी बोलले पाहिजे.' नेहरू खळखळून हसले व म्हणाले, '  बरोबर आहे, सौ. चव्हाणांशी तुम्ही जरूर बोला व मग मला कळवा. मी तुमच्या फोनची वाट पहात आहे.'

यशवंतरावांनी वेणूताईंशी चर्चा केली देशावर संकट आलेले असताना नेहरूंच्या मदतीला जायला हवे असा सल्ला त्यांनी दिला आणि संरक्षणमंत्री पदाची सूत्रे स्विकारण्यासाठी यशवंतराव दिल्लीला गेले.