कथारुप यशवंतराव-आपली मैत्री ही मैत्रीच राहू दे !

आपली मैत्री ही मैत्रीच राहू दे  !  
  
पत्रकार नरूभाऊ लिमये हे यशवंतरावांचे जवळचे मित्र होते. नरूभाऊंच्या जीवनात एक काळ असा आला होता की, ते कर्जबाजारी झाले होते. त्यांच्या सगळ्या कर्जाला यशवंतराव जामीनदार झाले होते. व्यक्तिगत आयुष्यात नरूभाऊ खूप वैतागले होते. डॉ. सरोजिनी बाबर यांनी यशवंतरावांच्या कानावर ही गोष्ट घातली. त्या म्हणाल्या, ' तुम्ही नरूभाऊकडे लक्ष द्या. तो खूप अडचणीत आहे.' यशवंतरावांनी ताबडतोब नरूभाऊला मुंबईला बोलावून घेतले. नरूभाऊ गेले. यशवंतरावांनी त्यांना घरी नेले. वेणूताईंनी त्यांना आग्रहाने जेऊ घातले. यशवंतरावांनी त्यांची सगळी चौकशी केली. मग म्हणाले, ' तुझ्यासाठी मी काय करू ते सांग.'

' मला कुठेतरी नोकरी द्या ' नरुभाऊ म्हणाले.

' तुला पुण्यात माझा जनसंपर्क अधिकारी म्हणून नोकरी देतो, चालेल ?'

' फार बरं होईल ' असे म्हणून व यशवंतरावांचे आभार मानून नरूभाऊ जायला निघाले. यशवंतरावांनी ड्रायव्हरला त्यांना स्टेशनवर पोचवायला सांगितले. नरूभाऊ गाडीत बसणार इतक्यात यशवंतराव म्हणाले, ' नरूभाऊ, जरा इकडे ये. '

नरूभाऊ जवळ आल्यावर साहेब म्हणाले, ' नरूभाऊ, मी तुला पुण्याला नोकरी देऊ शकत नाही. मी नंतर विचार केला, मी मुख्यमंत्री आहे. मी पुण्याला मुख्यमंत्री म्हणून आलो की तू माझ्यासमोर जनसंपर्क अधिकारी म्हणून उभे राहणे ही कल्पनाच मला नकोशी वाटते. तू पुण्याला जाऊ नकोस. इथेच रहा. उद्या आपण बोलू.' त्यादिवशी यशवंतरावांनी नरूभाऊंना ठेवून घेतले. नंतर नोकरी न करता पैसे मिळतील असे भाषांतराचे काम दिले. या कामाचे नरूभाऊंना त्या काळात चौदा हजार रुपये मिळाले. त्यांची आर्थिक अडचण दूर झाली. त्यानंतर आयुष्यात ते कधीच आर्थिक अडचणीत आले नाहीत. मित्राला मदत करतानासुद्धा यशवंतरावांनी मैत्रीचा सन्मान जपला.

म्हणूनच अनेकांच्या हृदयात त्यांना अढळ स्थान लाभले.