कथारुप यशवंतराव-वाहनयोग

वाहनयोग   

कवी आणि कवितांवर यशवंतरावांनी नेहमीच प्रेम केले, पण त्यातही प्रतिभावंत मराठी कवी ग. दि. माडगूळकरांवर त्यांचा विशेष लोभ होता. माडगूळकरांना ते ' आण्णा ' म्हणत असत. यशवंतराव चव्हाण आणि ग. दि. माडगूळकर म्हणजे महाराष्ट्राच्या राजकीय व सांस्कृतिक जीवनाची मानचिन्हेच होती. दोघे अनेकदा गप्पांची मैफिल रंगवीत असत. एकदा असेच साहेब, गदिमा व इतर चार - पाच साहित्यिक गप्पा मारत बसले होते. काव्य, शास्त्र, विनोदाची मुक्त उधळण चालू होती. वेळ कसा निघून गेला हे कोणाला कळलेच नाही. मध्यरात्र उलटून गेल्यावर कुणीतरी म्हणाले, ' चलू या आता.' गदिमा जायला उठले. साहेब त्यांना म्हणाले, ' जाणार कसे आण्णा ?'

गदिमा म्हणाले, ' तो एक प्रश्नच आहे, माझ्याकडे मोटार नाही. आमच्या कुंडलीत वाहनयोग नाही.'

यशवंतरावांनी त्यांच्या डॉयव्हरला गाडी काढायला सांगितले व मिश्किलपणे गदिमांना म्हणाले,

' आण्णा, आता असं करा, एक वाहन घ्या आणि त्यात तुमची कुंडळी लावून ठेवा.'

' का हो, असं का ?' सर्वांनी विचारले.

' कुंडलीत वाहन नाही, तर निदान वाहनता कुंडली असू द्या ' साहेब मिश्किलपणे म्हणाले. सारे खळाळून हसले.