कथारुप यशवंतराव-त्याला इंग्लंडला जाऊ द्या !

त्याला इंग्लंडला जाऊ द्या  !    
    
शाळेत शिकत असताना लहानग्या यशवंताला आपण संस्कृत शिकावे असे वाटले. त्याने संस्कृतच्या शिक्षकांना विचारले, ' तुम्ही मला संस्कृत शिकवाल का ?' शिक्षक म्हणाले, ' तू मराठा आहेस, ब्राह्मण नाहीस. त्यामुळे तुला शिकविता येणार नाही. ' संस्कृत शिकण्याची यशवंताची इच्छा अशाप्रकारे अपूर्णच राहिली. जातीयतेचा त्याला जाणवलेला हा पहिला चटका होता. पुढे यशवंताने स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. स्वातंत्र्य मिळाले, साहेब यशवंताचे यशवंतराव झाले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. राज्याच्या सर्वांगीण उन्नतीसाठी अहोरात्र झटू लागले.

एक दिवस आपल्या दालनात बसून ते साता-याच्या रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिका-यांशी चर्चा करीत होते. चर्चा चालू असताना एक चिठ्ठी आली. ती चिठ्ठी कोणी पाठवली होती ? तर लहानपणी साहेबांना संस्कृत शिकवायला ज्यांनी नकार दिला त्या शिक्षकांनी  !  साहेबांनी रयतच्या पदाधिका-यांना बाहेरच्या हॉलमध्ये बसायला सांगितले आणि त्या शिक्षकांना आत बोलावले. ते शिक्षक आपल्या मुलासह आत आले. साहेबांना म्हणाले, ' हा माझा मोठा मुलगा. आता इंजिनियरिंगची परीक्षा उत्तम गुणांनी पास झाला आहे. त्याला पुढच्या शिक्षणासाठी इंग्लंडला जायची इच्छा आहे. त्यासाठी मदतीची आवश्यकता आहे, म्हणून आलो होतो. '

यशवंतरावांनी त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. मग त्यांना बाहेर बसायला सांगितले आणि रयतच्या लोकांना आत बोलावले. साहेब त्यांना म्हणाले, ' आपण परदेशी जाण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करतो, त्यावेळी त्याची जात बघतो का ? तो अमुक जातीचाच असावा अशी आपली अट असते का ?' त्या काळात कर्मवीर भाऊराव पाटलांनी संस्थेमार्फत अनेक मुलांना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवले होते. त्यासाठी जातीचे बंधन मुळीच नव्हते. त्यामुळे संस्थेचे पदाधिकारी म्हणाले, ' नाही, अशी आपली मुळीच अट नाही.' त्यावर लगेच साहेब म्हणाले, ' मग बाहेर बसलेल्या गृहस्थाचे काम करून टाका. आपल्या संस्थेमार्फत त्यांच्या मुलाला शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवा.'

ज्यांनी विद्यादान करायला नकार दिला त्यांच्या मुलाला विद्यार्जनासाठी परदेशात जायला यशवंतरावांनी मदत केली. अशी ही जगावेगळ्या उपकाराची ( ? ) जगावेगळी परतफेड  !