कथारुप यशवंतराव- जनतेचे समाधान ही पुढा-यांची पहिली जबाबदारी आहे !

जनतेचे समाधान ही पुढा-यांची पहिली जबाबदारी आहे  !

१९७२ साली महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ पडला. अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला. पशुधन धोक्यात आले. शेतकरी देशोधडीला लागले. जनतेच्या सहनशक्तीची व सरकारच्या प्रयत्नांची कसोटी पाहणारा हा दुष्काळ होता. याच काळात बाळासाहेब विखे - पाटील नगर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते. शेतक-यांविषयी आणि त्यांच्या प्रश्नांविषयी बाळासाहेबांना विशेष आस्था होती. त्यांनी विसापूर येथे काँग्रेस पक्षातर्फे सर्वपक्षीय दुष्काळी परिषदेचे आयोजन केले. शेतक-यांना आपले गा-हाणे मांडता यावे आणि त्यावरील उपायांची चर्चा करावी हा परिषदेचा हेतू होता. पण जिल्ह्यातील काँग्रेसच्याच काही कार्यकर्त्यांना हे पटले नाही. त्यांनी चव्हाण साहेबांकडे बाळासाहेबांविरूद्ध तक्रार केली. त्यांचे म्हणणे होते की, या परिषदेला सगळ्या पक्षांचे लोक उपस्थित राहतील, सगळ्या पक्षांचे झेंडे तिथे असणार. सरकार विरोधात घोषणा होणार. काँग्रेसवर आणि मुख्यमंत्र्यांवर टीका होणरा. मग अशा परिषदेला बाळासाहेबांनी कशासाठी जावे ?

चव्हाण साहेबांनी सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले, आणि मग त्यांना विश्वासात घेऊन म्हणाले, ' हे बघा, परिषद कोणी बोलावली ?'

' जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षाने .'

' उपाध्यक्ष कोणत्या पक्षाचा आहे ?'

' काँग्रेसचा.'

' म्हणजे यात पुढाकार काँग्रेस पक्षाचा आहे. बरं, या दुष्काळी परिषदेचा अध्यक्ष कोण आहेत ? , तर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब विखे पाटील. ते आपल्याच पक्षाचे म्हणजे काँग्रेसचेच आहेत ना ! म्हणजे या परिषदेचे श्रेय पक्षालाच मिळणार ना ! काँग्रेस लोकांचे पुढारपण करीत असेल तर त्यात वावगे काय आहे ? जनतेची मागणी पूर्ण करणे ही पुढा-यांची पहिली जबाबदारी आहे. तिकीट मागणे ही नाही.'

तक्रार करायला आलेले लोक निरुत्तर होऊन निघून गेले.