कथारुप यशवंतराव- नेहमी धूळ चारणाराने .....!

नेहमी धूळ चारणाराने .....!

नांदेड येथे आयोजित केलेल्या याच पाचव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंम्मेलनास विख्यात नाटककार आणि संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात यशवंतरावांवर जहाल टीका करणारे आचार्य प्र. के. अत्रे देखील उपस्थित होते. उदघाटक आणि अध्यक्षांच्या भाषणापूर्वी आचार्य अत्रे यांचे भाषण झाले. अत्र्यांचे भाषण म्हणजे हशा आणि टाळ्यांचा अनोखा संगम. शिवाय आज एकाच व्यासपीठावर दोन दिग्गज नेत्यांची भाषणे ऐकायला मिळणार याचा श्रोत्यांना आनंद झाला होता. आचार्य अत्रे आपल्या भाषणाच्या सुरुवातीला म्हणाले, ' मुंबईहून एवढा मोठा प्रवास करून मी आलो. रस्ते दगडधोंड्यांनी भरलेले . धूळ तर अवर्णनीय होती. मराठवाड्यातल्या रस्त्यांवरील धूळ खात खात इथपर्यंत येऊन पोहोचलो ... यशवंतरावांच्या राज्यात रस्त्यांची ही स्थिती .... ' असे म्हणून त्यांनी साहेबांकडे पाहिले. श्रोत्यांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. त्यानंतर उदघाटनपर भाषणासाठी साहेब उभे राहिले. हसत हसत म्हणाले, ' आचार्य अत्रेंनी धुळीची तक्रार केली, पण नेहमी दुस-याला धूळ चारणाराने एकदा तरी स्वत: धूळ खावी ना !' या मार्मिक टोल्याने अत्र्यांसह सगळे श्रोते हास्याच्या कल्लोळात बुडाले.