कथारुप यशवंतराव- ज्ञानेश्वरांच्या नावानेच कॉलेज निघाले पाहिजे !

ज्ञानेश्वरांच्या नावानेच कॉलेज निघाले पाहिजे  !

१९६७ ची गोष्ट. यशवंतराव केंद्रीय गृहमंत्री होते. एकदा नगर जिल्ह्याच्या दौ-यावर आले असताना नेवासे येथे एका कार्यक्रमासाठी ते आले होते. त्यावेळी यशवंतराव गडाख नेवासा पंचायत समितीचे सभापती होते. नेवाशात महाविद्यालय काढायचे ठरले होते. या संदर्भात नेवाशाला ज्ञानेश्वर मंदिरातच एक बैठक आयोजित केली होती. बैठकीला यशवंतराव, आण्णासाहेब शिंदे व इतर नेते उपस्थित होते.

कॉलेजसाठी जागा, इमारत, मंजूरी इत्यादी विषयांवर चर्चा झाल्यावर शेवटी कॉलेजला कोणाचे नाव द्यायचे हा प्रश्न चर्चेला आला. जो कोणी सर्वाधिक देणगी देईल त्याचे नाव कॉलेजला द्यावे असे कोणीतरी सुचवताच यशवंतराव तात्काळ म्हणाले, ' कुणी कितीही पैसे दिले तरी, इथे ज्ञानेश्वरांच्या नावानेच कॉलेज निघाले पाहिजे.' या कॉलेजसाठी व्यक्तिगत एक हजार रुपयांची देणगीही त्यांनी लगेच दिली.
यशवंतरावांचा पुढचा कार्यक्रम श्रीरामपूरला होता. तिथे आण्णासाहेब शिंदे यांनी डाकले यांना महाविद्यालय एक लाख रुपयांची देणगी देण्याची गळ घातली. नाव देता येणार नाही हेही स्पष्ट केले. नेवाशातील बैठकीचा वृत्तांतही सांगितला. डाकले यांनीही उदार मनाने एक लाखाची देणगी दिली. नेवासा इथे संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सुरू झाले.

संतपरंपरेविषयी यशवंतरावांना अपार आदर होता. म्हणूनच मराठी मनाची मशागत करणा-या संतांविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी त्यांनी दवडली नाही.