यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र २८- २६०९२०१२

पत्र - २८
दिनांक २६-०९-२०१२

चि. सुप्रिया,
सप्रेम जयभीम.

आता तारीख लक्षात नाही.  पुण्याहून आम्ही सातारला येत होतो.  साहेब म्हणाले, लक्ष्मण, आता सासुरवाडीकडले लोक येतात की नाही, काय म्हणते सासुरवाडी ?

साहेब माझे सासरे फार चांगले आहेत.  पुरोगामी आहेत, हुंडेकरांचा व्यवसाय आहे.  स्वातंत्र्यसैनिक आहेत.  खादीशिवाय अन्य कपडे मी कधी त्यांच्याकडे पाहिले नाहीत.  पांढरेशुभ्र कपडे, आपल्यासारखी टोपी, जाकीट, काँग्रेसवालेच आहेत.  पण नातेवाईक सारे उच्च कुलीन, शिवाजी पेठेत थोरली मेहुणी भोसल्यांकडे सरनोबत वाड्यात तर धाकडी घोरपड्यांकडे, मधली शिंद्यांकडे.  शशी तिसरी.  तिने असा पराक्रम केला.  त्याने सारे नातेवाईक आम्हाला शोधत हिंडत होते.  आम्ही शामराव पटवर्धन यांच्या घरात लपून बसलो होतो आठ दिवस.  सापडलो असतो तर खैर नव्हती.  सासर्‍यांनी एवढेच समजावून घेतले की लग्न दिवाण बहादूर सबनीसांच्या घरात झाले.  लग्नात पुढाकार समाजवादी विचारवंत नेते मा. बापूसाहेब पाटलांनी घेतला होता.  त्यांनी माझा पाय काढणार्‍यांना सांगितले.  'माझ्या मुलीनं लग्न केलं आहे.  मग जावयाचा पाय काढून काय पोरीचं वाटोळं करायचंय.  शाहू महाराजांच्या नावानं नुसत्या मिशा पिळता.  मग त्यांनी सांगितलेलं का कळत नाही ?'  यावर बरीच गरमागरमी होऊन विषय मिटला.  बारा वर्षे झाली लग्नाला, पण कुणीही आले नाही आमच्याकडे.  शशीच जाते केव्हातरी.

अरे, म्हणजे माहेर बंदच आहे तर.

हो.  घरातल्या स्त्रिया मान्य करीत नाहीत.

ठीक आहे.  भेटले पाहिजे एकदा सासर्‍यांना.  काय नाव म्हणालात ?

श्रीपतराव भोसले, हुंडेकरी, राजारामपुरीत टाकाळ्यावर राहतात.  

ठीक आहे.

साहेब, मी सातारा सोडायचा विचार करतोय.
आणि ?

आणि पुण्याला कुटुंब हलवावे म्हणतोय.  तशी जागा पण बाबा आढावांनी धनकवडीला पाहिलेय.  भाड्याने तर राहायचे.  इथे सातारला आमची संघटना होती.  त्यातही बारा जणांची तोंडे बारा वाटेला.  त्यात काही ज्येष्ठ सहकार्‍यांना वाटते हा आता गेला.  आपल्यासोबत राहणार नाही.  त्यात आपला अनुभव म्हणून ते सांगतात.  यशवंतरावांनी एखाद्याच्या खांद्यावर हात टाकलाना की तो त्यांच्या गळाला लागतो.  तो त्याच्यासोबत जातो.  त्यामुळे मी तुमच्याबरोबर संपर्क वाढवला याचे वैषम्य असणारा वर्ग आहेच.  त्यामुळे इथे कटकटी करीत राहण्यापेक्षा पुण्याला गेलेले बरे.  बाबा आढावांसोबत सतरा-अठरा वर्षे काम केले आहे.  पुणे तसे मध्यवर्ती ठिकाण आहे.  राज्यभर जाता येते.  रेल्वे, एस.टी.ची सोय होईल.  म्हणून पुण्याला जाण्याचा विचार करतोय.  साहेब गंभीर होते.

लक्ष्मण, मी सर्वांशी प्रेमाने वागतो.  विरोधकांशी तर फारच प्रेमाने वागतो.  माझे सर्व पक्षात मित्र आहेत.  राजकारण वेगळे, व्यक्तिगत संबंध वेगळे, राजकारणात विचारांचे संघर्ष असतात, व्यक्तींचे नाही.  त्यामुळे माझ्याकडे माझ्या पक्षातले महत्त्वाचे कार्यकर्ते कामे घेऊन येतात तसे विरोधी पक्षाचेही कार्यकर्ते येतात.  माझ्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना मी थोडे थांबायला सांगतो आणि विरोधी पक्षातल्या कार्यकर्त्यांची कामे प्राधान्य देऊन करतो.  हेतू हा, की आपला कार्यकर्ता आपलाच असतो.  तो थोडा थांबला तर रागवणार थोडाच आहे.  आणि समजा रागावला तर समजूत काढता येते.  तसे विरोधकाचे नाही.  तो आपल्या विरोधी नाही, आपल्या धोरणाच्या विरोधत आहे.  त्याचे काम तत्काळ केले तर त्याला बरे वाटेल आणि धारही कमी होईल.  तेव्हा खांद्यावर नुसता हात ठेवलेल्याने आपलेपणा वाढेलच असे नसते.  आपलेपणा मनातही असावा लागतो.  तो माझ्याकडे होता.  त्यांना त्यांची माणसे सांभाळता येत नाहीत, त्याला मी काय करणार, नाही का ?