यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र २८- २६०९२०१२-३

मी हो म्हणालो.
सातारला असते का ?
मी हो म्हणालो.
तिने लक्ष्मण माने नावाच्या माणसाशी विवाह केलाय ?
मी हो म्हणालो.  मला कळेचना, कशासाठी चौकश्या करीत आहेत.
ते हसू लागले.  आम्ही कार्यकर्ते मोठ्या पेचात पडलो होतो.  चव्हाणसाहेब आलेत इथे, रसिकभाईंच्या घरी आहेत.  माझ्याकडे काही कार्यक्रम आहेत त्यांचे.  त्यांना श्रीपतराव भोसले यांना भेटायला जायचे आहे.  आता आली का पंचाईत.  कुणालाच कळेना, हा श्रीपतराव भोसले कोण ?

साहेबांना विचारले.

ते म्हणाले, तुम्ही 'उपरा' वाचले नाहीत काय ?  ते लक्ष्मण माने यांचे सासरे आहेत.  हुंडेकरी आहेत.  आणि सारा तिढा सुटला.  सारे हसू लागले.  तुमचे नाव सर्वांनी सांगितले.  तरीही मला खात्री वाटत नव्हती.  म्हणून मी फोन करून खात्री करून घेण्याचे ठरवून तुम्हाला फोन केला.  चव्हाणसाहेबांना तुम्हाला भेटायला यायचे आहे.  मी थोडा गोंधळलो.  दादा, मी येतो ना ?

नाही.  साहेबांना यायचे आहे तुमच्या घरी.

मी बरं म्हटलं.  घरी तात्काळ पोहोचलो.  मी घरात कुणाला काही सांगत होतो तोवर श्रीपतराव दादा बोंद्रे, माझे मित्र व राज्यात मोठे मंत्री होते.  चव्हाणसाहेबांचे भक्त, करवीरचे आमदार.  ते आणि खुद्द यशवंतराव चव्हाणसाहेब दारात उभे.  हॉलची आवराआवरही करता आली नाही.  साहेब आले.  सोफ्यावर बसले.  शेजारी दादा बसले.  घरात कोणीच नव्हते.  हार-शाल आणायलाही वेळ मिळाला नाही.  साहेबांनी नमस्कार केला.  मोठ्या कौतुकाने माझ्याकडे पाहत राहिले.  अत्यंत छान हसले.

श्रीपतराव, मला बघून तुम्हाला फार आश्चर्य वाटले असेल ना ?  चव्हाणसाहेब म्हणाले.

साहेब, कसलीच कल्पना नसल्याने आपले स्वागतही करता आले नाही.  क्षमा करा.  मला बोलावले असते तरी आलो असतो मी.

साहेब म्हणाले, ते सोडा, ते महत्त्वाचे नाही.  'उपरा' वाचले की नाही ?
मी 'नाही' म्हणालो.

ते म्हणाले, ते आणून वाचा.  तुमच्या शशीने केवढे मोठे काम केले आहे.  आपल्या घराघरात अशा कर्तबगार मुली जन्माला याव्यात असे वाटते.  किती अडचणीत तिने घर चालवले.  मी तिच्या घरी जाऊन जेवून आलो.  छान केला होता तांबडा, पांढरा रस्सा.  कोल्हापुरातल्या जुन्या काळाची आठवण झाली.  गुणी मुलगी आहे.  बारा वर्षे झाली तुम्ही काही राग सोडला नाही.  

साहेब ती येते.  पण आम्ही जात नाही.  आपला समाज तुम्हाला माहीत आहे.  घरातली मंडळी हे स्वीकारत नाहीत, त्यामुळे नाही गेलो.  मी म्हणालो.

साहेब थोडे गंभीरपणे म्हणाले, तुम्हा लोकांना मी काय सांगावे.  तुम्ही कोल्हापूरकर सारे महाराजांबद्दल किती आस्था बाळगता मला माहीत आहे.  उठताबसता महाराजांचे नाव घ्यायचे, पण त्यांचे ऐकायचे मात्र नाही, असे कसे ?  महाराजांनी स्वतः जाती मोडण्यासाठी सारे आयुष्य खर्ची घातले.  आपल्या घरातली मुलगी धनगर समाजात दिली.  खरे की नाही ?  त्यावेळी घरातल्या लोकांनी विरोध केलाच होता की आपण ज्या शिवछत्रपतींचे नाव घेतो मोठ्या अभिमानाने त्यांनी बजाजीराव निंबाळकरांच्या मुलाला आपली मुलगी दिली.  बजाजीराव तर मुस्लीम झाले होते.  त्यांना धर्मात तरतूद नसतानाही धर्मशास्त्र गुंडाळून ठेवून पुन्हा हिंदू करून घेतले.  आपली मुलगी त्यांच्या मुलाला दिली.  खरे की नाही ?  आपली पुराणे तर काय काय सांगतात.  सारे महाभारत, रामायण, किती दाखले देऊ सांगा !  मी आपल्याला सांगायला आलोय.  तुम्ही शशीला मुलगी माना की मानू नका.  मी तिला मुलगी मानलीय, लक्ष्मणला जावई मानले आहे.  सारे तिचे माहेर मी करणार आहे.  तुम्ही सारेजण तिला स्वीकाराल.  तिला हे घर पुन्हा मायेने आत घेईल तर बरे.