मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १००

१००.  स्पष्टवक्ते साहेब -  अनंतराव जाधव

ही कथा सन १९५९-६० सालातील आहे. त्या वर्षी श्री. वासुदेव बळवंत गोगटे हे पुणे महानगरपालिकेचे महापौर होते. त्याच वर्षी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची सभा आणि काँग्रेस वर्किंग कमिटीची सभा पुण्यात भरली होती. त्यानिमित्ताने अखिल भारतातून नामवंत कीर्तीचे पुढारी पुण्यात आले होते. या सर्वांना भोजनासाठी व सत्कारासाठी पुणे महानगरपालिकेने तिच्या मुख्य कार्यालयाच्या नवीन इमारतीत आमंत्रित केले होते. दुर्दैवाने स्थानिक काँग्रेस सभासदांनी या समारंभात भाग घेण्याचे नाकारले होते.

या समारंभासाठी इमारतीच्या दक्षिण बाजूकडील मोकळ्या पटांगणात एक सुंदर शामियाना उभारला होता. या शामियानाचे दोन भाग केले होते. एक व्यासपीठाचा व दुसरा बैठकीचा. दोन्ही ठिकाणी भोजनाची व हात धुण्याची व्यवस्था होती. व्यासपीठावर व्ही. आय. पी. साठी खास व्यवस्था होती. शिवाय विजेचे रंगी-बेरंगी दिवे लावून भरपूर शोभा आणली होती. भोजनासाठी महाराष्ट्रीय पद्धत होती. ताट, वाट्या, वगैरे.

समारंभाच्या वेळी म्हणजे सायंकाळी ठीक ८ वाजता पंडित जवाहरलाल नेहरू यांची मोटार पोर्चमध्ये येऊन थडकली. त्या वेळी पाच-सहा मंडळीच उपस्थित होती. सुदैवाने महापौर गोगटे उपस्थित होते. पंडितजी दिसताच महापौरांची धांदल उडाली. महापौरांनी पंडितजींना एकदम तिस-या मजल्यावर नेले. तेथील सभेचा हॉल, महापौर कार्यालय व समिती-कार्यालये दाखविली. कॉर्पोरेशन सभेचा हॉल व तेथील फर्निचरची मांडणी पाहून पंडितजी एकदम म्हणाले, "Here Corporators will be fulled to sleep."

इमारतीचा काही भाग दाखविल्यानंतर महापौर हे पंडितजी यांच्या समवेत तळमजल्यावरील शामियानांत आले. तोपर्यंत आमंत्रित पाहुणे मंडळी आली होती. व्ही.आय. पीं. ना व्यासपीठावर बसविले. इतरेजन शामियान्यात स्थानापन्न झाले. भाषणे व पुष्पहार-अर्पणाचा कार्यक्रम संपल्यानंतर भोजनाची त्याच ठिकाणी तयारी केली होती. भोजन महाराष्ट्रीय पद्धतीचे व संपूर्ण शाकाहारी होते. बुंदीचे लाडू, वरण-भात, आळूची भाजी, कोशिंबि-या, पापड, लोणची चटण्या वगैरे. व्यासपीठावरची वाढण्याची व्यवस्था स्वत: डिंगणकर आचारी पाहात होते. ते स्वत: लाडू आग्रहाने वाढत होते. पंडितजींच्या शेजारी एका बाजूला महापौर व दुस-या बाजूला चीफ मिनिस्टर ना. यशवंतराव चव्हाण बसले होते. पंडितजींच्या ताटात एकदम दोन लाडू टाकले व इतरांना एक एक वाढला. तेव्हा पंडितजी यशवंतरावांना म्हणाले, "Why I should have two and you should have one only?" असे म्हणून त्यांनी आपल्या हातांनी आपल्या ताटातला एक लाडू उचलला, आणि तो यशवंतरावांच्या ताटात टाकला ! यशवंतराव त्यावर हसले. भोजनास त्यानंतर सुरूवात झाली. थोडया वेळाने पंडितजींनी वाटीकडे बोट करून " what is this green curry?", असे यशवंतरावांना विचारले. त्यावर यशवंतराव म्हणाले, "It is आळुची भाजी.  It is very testy and very popular in Maharashtra पंडितजींनी ताबडतोब दोन बोटे वाटीत बुचकळून एक भुरका मारला. त्या वेळी त्यांच्या चेह-यावर समाधान दिसले.

या पुणे शहराची प्रसिद्धी महाराष्ट्रात अनेक कारणामुळे व अनेक प्रकारची आहे. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रांत तर पुण्याने लौकिक यापूर्वीच मिळविला आहे. पण क्रीडाक्षेत्रात या पुण्यात इतक्या संस्था असतानाही ते फारच मागे राहिले होते. पुणे महानगरपालिकेने या पुण्यात जवाहरलाल स्टेडियम बांधण्यापूर्वी एकही स्टेडियम नव्हते. यामुळे या शहरात स्टेडियम नसणे ही गोष्ट लांछनास्पद आहे, ती उणीव लौकरच भरून काढावयास पाहिजे, अशी तक्रार व मागणी येथील क्रिकेट शोकिन व संस्था कधी वृत्तपत्रांतून तर कधी जाहीर सभांतून करीत होते. शहराच्या या मागणीला पुणे महानगरपालिकेने सक्रिय पाठिंबा प्रथम देऊ केला. पण पुढे ती काही काळ गप्प बसली. मात्र येथील महाराष्ट्र क्लब व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन या दोन्ही संस्थांनी या तक्रारीचा व मागणीचा पाठपुरावा चालू ठेवला होता. ह्या बाबतीत झालेला गाजावाजा व प्रचार राज्य सरकारच्याही लक्षात आणून दिल्यावर त्यांनी पुणे महानगरपालिका स्टेडियम बांधण्यासाठी जेवढा खर्च करील तेवढी रक्कम राज्य सरकार आर्थिक मदत म्हणून देईल असे जाहीर केले होते.