मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ९८

९८. नाते जिव्हाळ्याचे – एन्. आर. खालावडेकर

श्री.यशवंतराव चव्हाण यांच्या सुरक्षा व्यवस्थेमुळे १९४८ सालापासून त्यांच्याशी मला जवळीक लाभली व त्यांच्या स्वभावाचे अनेक पैलू पाडता आले. हवालदार असल्यापासून पोलीस इन्स्पेक्टर म्हणून निवृत्त होईपर्यंत मला हा योग लाभला.

१९४८!

स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचा कालखंड. काँग्रेस पक्षाची मंत्रिमंडळे अस्तित्वात आली होती. त्या वेळच्या सातारा जिल्ह्यातील काही घडामोडींमुळे त्या जिल्ह्यातील काही नेत्यांच्या संरक्षणाकडे खास लक्ष देण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार श्री.यशवंतराव चव्हाण यांच्या सातारा, सांगली, कोल्हापूर परिसरातल्या भेटीच्या वेळी त्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली. त्या वेळी मी सातारा पोलीस स्टेशनमध्ये हवालदार म्हणून काम करीत होतो. परंतु हे काम अत्यंत जबाबदारीचे आणि गुप्ततेचे असल्यामुळे मला माझ्या पोलिस खात्यातल्या नोकरीचा सुगावा लागू न देता चोवीस तास ‘‘साहेबां’’ च्या सान्निध्यात राहावे लागे! मला कोणी ओळखू नये, यासाठी मी अशा वेळी एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची भूमिका वठवत असे. संपूर्ण खादीधारी वेशात त्यांच्याबरोबर राहणे सर्वच दृष्टीने सोयीचे होते.

त्या वेळी विट्यापासून जवळच असलेल्या हनुमंतवाडी या खेडेगावातील आपल्या एका वृद्ध नातेवाईक स्त्रीच्या घरी साहेब गेले होते. सोबत लहानमोठे कार्यकर्ते आणि अधिकारी होतेच. त्या घरी जाताच त्या वृद्ध बाई त्यांना पाहून बाहेर आल्या. यशवंतरावांना पाहून त्यांना गहिवर आला. त्यांनी त्यांच्या कानशिलावरून बोटे फिरविली आणि म्हणाल्या, ‘‘कौन, येशा हाये व्हय? लोक म्हनत्यात तू राजा झालास म्हून?’’ इतक्यात त्या घरातील एक लहानसा सहा-सात वर्षांचा मुलगा धावत बाहेर आला. मळक्या कपड्यातल्या, शेंबूड आलेल्या त्या पोराने मिठी मारल्यामुळे श्री.चव्हाणांचे परीट घडीचे कपडे मळले.’’ ते पाहून त्या वृद्ध स्त्रीने ‘‘द्वाड कुठलं! त्याचं धडुतं वाईट करतोस व्हय?’’असे म्हणून त्याला दोन चार धपाटे घातले. साहेब कळवळले आणि त्यांनी भोकाड पसरणा-या त्या मुलाला उचलून घेतले.

आपले कपडे खराब होतील याची पर्वा न करता ते म्हणाले, ‘‘मावशी का मारतेस त्याला? खरं म्हणजे माझंच चुकलं! मीच येताना काहीतरी खाऊ आणायला पाहिजे होता. देवराष्ट्रात असताना मी का कमी घाण करत होतो? त्या वेळी तुम्ही मला अंगाखांद्यावर घेऊन खेळवीत होताच ना? त्या वेळचा मी तुमच्या समजुतीप्रमाणे राजा झालो आहे. हा तर स्वातंत्र्यांत जन्माला आलेला आहे. आज तो कसाही वागला तरी उद्या छत्रपती का होणार नाही?’’ असे बोलून त्यांनी मला ताबडतोब खाऊ आणावयास पाठवून दिले.

साहेबांच्या केवळ कनवाळू वृत्तीचाच नव्हे तर स्वातंत्र्य काळातील मुलांना मिळणा-या अनेक गोष्टींचा त्यांच्या नजरेसमोरचा आलेखही या प्रसंगातून जाणवत राहतो.

साहेबांची १९४८ च्या सुमाराचीच ही आणखी एक आठवण. क-हाड येथील मामलेदारांच्या कार्यालयाला भेट देण्यासाठी निघाले होते. त्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारापाशीच ते स्तब्ध उभे राहिले. काय झाले ते क्षणभर कोणालाच कळले नाही. नंतर त्यांच्या बोलण्यावरूनच त्या गोष्टीचा उलगडा आम्हा सर्वांना झाला.