यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : ८३

२) हे करंटेपणाचे लक्षण नव्हे काय?

श्री. यशवंतराव चव्हाण यांचे नेतृत्व गेली तीस वर्षे वर्धमान राहिले. त्यांनी महाराष्ट्र एकसंघ राखला व त्यांनी महाराष्ट्राचा डी. एम. के. होऊ दिला नाही; महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळ ही त्यांची कल्पना. पुष्कळ प्रकारे व अनेक बाजूने पाहिल्यास त्यांचे नेतृत्व लाभदायक झाले आहे. हे नेतृत्व संपावे व संपले असे विचार व्यक्त झालेले आढळतात. पण वर्धमान नेतृत्व हे वर्धमान राहावे असे शुभ व विधायक का चिंतू नये? यापूर्वी असा कोणताच नेता झाला नाही. त्याच्या हातून एकही चूक घडली नाही व पुढेही असा कोणताही नेता होणे अशक्य आहे की- ज्याच्या हातून एकही चूक होणार नाही! सर्व नेतृत्वाला मर्यादा असतातच. ज्यांना सत्तेवर यावयाचे असते, त्यांनी पहिले वर्धमान विकासक्षम नेतृत्व आडवे येते, असे वाटणे साहजिकच आहे. पण सत्ता हे साधन आहे. पक्षनिरपेक्ष असा काही विचार करावा लागतो. पुढे आलेले नेतृत्व मागे जावे, खलास व्हावे, असे चिंतणे-बोलणे हे एक करंटेपणाचे लक्षण नव्हे काय? श्री. यशवंतराव यांच्या हातून उत्तरोत्तर देशाची अधिक सेवा व्हावी असे चिंतणे हे देशहिताच्या दृष्टीने योग्य होईल. श्री. यशवंतराव हे देश हा पक्षापेक्षा, सत्तेपेक्षा व व्यक्तीपेक्षा श्रेष्ठ समजतात. म्हणून सारासार विचार होणे क्रमप्राप्त आहे. श्री. यशवंतरावांनी फॅसिस्ट शक्तींच्याविरूद्ध आवाज उठविला व उठवतील. सामूहिक नेतृत्वाचा पुरस्कार व प्रचार ते करीत आहेत. महाराष्ट्रातून पुढे येऊन अखिल भारतीय स्तरावर पोहोचलेले नेतृत्व यापुढेही वर्धमान राहावे हा विवेक निदान विचारवंताकडून तरी अपेक्षिणे जरूर वाटते. कोणाचेही गुणाधिक्य लक्षात घ्यावेच लागते. विरोधकांनी व टीकाकारांनी टीका करावी, पण तोल देखील सांभाळावा. आत्मपरिक्षणाची गरज सर्वांनाच आहे.

रा. ना. चव्हाण, वाई
(दैनिक विशाल सह्याद्री – ११ एप्रिल १९७८)

३) यशवंतरावांचे नवे धोरण

खासदार चव्हाण हे प्रधानत: राजकीय नेतृत्व आहे, त्यांनी सातारा जिल्ह्याचा दौरा नुकताच केला. त्यांची राजकारणाच्या दृष्टीची तेथील भाषणे अभ्यसनीय वाटतात. त्यांनी जशी परमार्थाला निवृत्ती जरूर असते तशी ती राजकारणात आवश्यक नाही असे सांगितले. विकेंद्रीकरणात्मक पंचायत राज्ये वर्धमान राहिली पाहिजेत. जनता पक्ष हा रा. स्व. संघ- जनसंघ यांच्याशी संपूर्ण विग्रह घेऊ शकत नाही. म्हणून यापुढे जनता पक्षाशी सहकार्य करणे अनुभवांती अयोग्य होय, असा निष्कर्ष घेतला. लोकशाही, समाजवाद व निधर्मी धोरण ही त्यांची राजकीय तत्वे ठाम आहेत व होती हे कोणालाच विसरता येणार नाही.

सत्तेवर असताना व सत्तेपासून दूर असताना त्यांनी मानसिक तोल सांभाळला आहे. विरोधकांवर टीका करताना त्यांचा संयम नेहमी असतो. राजकारणात मतभेद, चढउतार, यशापयश व चुका ह्या सा-या बाबी अशक्य नाहीत. मनुष्य व एक थोर विवेकी व्यक्ती म्हणून चिकित्सक, विचारवंतांनाही ते आदर्श वाटतात. मूळची म. गांदी व प. नेहरूंची काँग्रेस टिकून वर्धमान व्हावी हे त्यांचे ध्येय आहे. हे बहुजनांच्या हिताचे आहे.

इंदिरा काँग्रेसमध्ये ज्यांनी पक्षांतर (म्हणजे राजकीय धर्मांतर) केले, त्यांना चव्हाणांचे वरील ध्येय धोरण अनुभवांती पुढे कळून चुकेल! सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टीने श्रीमान दादा व मोहिते वगैरे तत्समांना चव्हाणांचे ध्येय-धोरण विचारा-आचारात घ्यावे लागले. विद्यमान बेकीचा फायदा इतरांना मिळू देणे हे कोणाच्याच हिताचे नव्हे. मागील सर्व विसरून सर्वांनीच नवा विचार करावा. चव्हाणांच्या नेतृत्वाच्या साह्याने वरील सर्वांना पुढे येणे शक्य झाले. चव्हाणांमध्ये आत्मपरिक्षण आत्मटीका व काळानुसार राजकीय तत्वनिष्ठ परिवर्तन शक्ती आहे. विरोधासाठी विरोध हा त्यांचा कधीच पवित्रा नसतो. सदुसष्टाव्या वर्षात त्यांनी पदार्पण केले आहे. त्यांना आयुरारोग्य चिंतृन, त्यांचे अभिष्ट चिंतणे हे एक सामाजिक कर्तव्य देखील ठरते.

रा. ना. चव्हाण, वाई
(दैनिक विशाल सह्याद्री – १८ मार्च १९८०)