यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : ८५

परिशिष्ठ क्र. १
लोकनेते यशवंतराव चव्हाण यांची वैचारिक बैठक, विचार व संस्कार

१)“गरीब मनात नव्या आकांक्षा उत्पन्न करून त्यांना कार्यप्रवण करण्यास प्रवृत्त करण्याऐवजी त्यांच्यात असंतोष पसरविण्याचा प्रयत्न झाला तर रात्री त्याचे लक्ष त्या श्रीमंतांच्या तिजोरीकडे जाईल इतकेच. पण खरा प्रश्न कायमच राहिल. पैसा हा पुंजीपतीच्या किंवा सरकारच्या तिजोरीत नसून तो आकाशातील ढगात आहे. त्या ढगातून खाली पडणा-या जलसंधरात आहे. त्या पाण्याच्या प्रवाहरूपी नदीत आहे. नदीच्या दुकाठास मिळणा-या काळ्या जमिनीत आहे. त्याच जमिनीतील खनिज संपत्तीत आहे, त्याच खनिज संपत्तीद्वारा निर्माण होणा-या वैज्ञानिक यंत्रसामुग्रीत आहे. इतकेच नव्हे तर तो सर्वांना एका सूत्रात बांधणा-या मनगटात आहे. असे जर या गरीब जनतेला पटवून देऊन त्यांच्यात सृजनशक्ती निर्माण करून कार्यप्रवण केले तर आपले सर्व प्रश्न सुटतील व त्या सुटण्यातच भारतीय लोकशाहीचे भवितव्य सामावलेले आहे.”

(‘हिंदी लोकशाहीचे भवितव्य’ वसंत व्याख्यानमाला, पुणे १९५२)

२) “आपल्याला मिळालेल्या राजकीय स्वातंत्र्याचा उपयोग करून आपणाला दारिद्र्य, रोग आणि अज्ञान यापासून मुक्त व्हावयाचे आहे आणि इतर मूलभूत स्वातंत्र्ये प्राप्त करावयाची आहेत. या सर्वांच्या प्राप्तीनंतर आजच्या आपल्या राजकीय स्वातंत्र्याला खराखुरा अर्थ येईल. स्वातंत्र्याचे खरे फळ म्हणजे एखाद्या व्यक्तीचा किंवा गटाचा अल्पस्वल्प लाभ नव्हे, तर सबंध समाजाचे जास्तीत जास्त कल्याण होय.”

(द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून केलेल्या पहिल्या भाषणातून, १५-८-१९५७)

३) “केवळ शेतीवर आधारलेला देश आर्थिक दृष्टीने उन्नत होत नाही. शक्तिशाली हिंदुस्थान करावयाचा आहे. सामर्थ्य संपन्न व समृद्ध देश करावयाचा आहे. त्याकरिता औद्योगिक शक्ती वाढली पाहिजे. खेड्यापाड्यांत विजेचा वापर झाला पाहिजे. ही बिजली खेड्यात गेल्याशिवाय उत्पादन वाढणार नाही. शेतीसोबत लहान उद्योग वाढून खेड्यांची शक्ती आणि ज्ञान विकसित झाले पाहिजे. मुंबई, मद्रास, कलकत्ता आदि मोठमोठ्या शहरात विजेता झगमगाट दिसतो आणि खेडी तेवढी अंधारात ही परिस्थिती बदलायची आहे, तोच आजचा खरी प्रश्न आहे. सोबतच त्यांच्यात शिक्षणाचा विकास झाला पाहिजे. त्यांच्यातील अज्ञान घालविले पाहिजे. हे महत्वाचे बदल आणण्याकरिता पहिल्या दोन पंचवार्षिक योजना झाल्या असूनही शेतक-यांना त्यांचा खराखुरा फायदा झाला नाही. हे खरे आहे की शेती सुधारली नाही, तर काहीच होणार नाही. त्याकरिता शेतक-यांना, त्यांच्या मुलांना उच्च शिक्षण मिळाले पाहिजे. त्याला अडाणी ठेवून त्याचा विकास कसा होईल? नवा विचार, नवा माणूस निर्माण केल्याशिवाय काहीच साधणार नाही. मी हे नवीन स्वप्न पाहतो. हे महाराष्ट्र राज्याचे स्वप्न आहे.”

(शहीद शंकरदिन समारंभ, जानेवारी १९६१)