यशवंतराव चव्हाण यांचे समाजकारण : ७८

दलितोद्धार व यशवंतराव

स्वातंत्र्य स्वराज्यार्थ राजकारणाचे दिवस होते. सर्व बहुजन समाज स्वातंत्र्य प्राप्तीसाठी राष्ट्रीय गांधी-नेहरू काँग्रेसमध्ये गेला. हे महर्षि शिंदे (मृ. १९४४) यांनी डोळ्यांनी पाहिले. शिंद्यांची शताब्दी चालू असताना महर्षि शिंदे यांचे पोष्टाचे तिकीट निघावे म्हणून वाई ब्राह्मोसमाज (सेक्रेटरी गु. रा. कृ. बाबर) यांनी दिल्लीपर्यंत पोष्टखात्याकडे पत्रव्यवहार केला. स्वत: यशवंतरावांनी देखील खटपट तेथे केली. यश आले नाही. पुढे हा यशाचा काळ असेल. तर्कतीर्थ – विश्वकोश यांनाही यशवंतरावांनी शिंदे साहित्याची दखल घेण्यास सांगितले होते. पत्र त्यांचे आले आहे असे प्रभावरी संपादक रा. ग. जाधव यांनी खुद्द मला सांगितले. विठ्ठल रामजीबद्दलचा त्यांच्यात जिव्हाळा फार मोठा होता. म्हणून मी दोघांतील साम्य स्थळे सांगितली. राहाता राहिला मुद्दा तो दलितोद्दाराचा.

महारवतन कायदा सुधारून व्यापकपणे तो पास करून घेण्याची यशश्वीता चव्हाणांनी पादाक्रांत केली व शिंदे-आंबेडकरांचे स्वप्न पुरे केले. धर्मांतरीत बुद्धांच्या सवलती कायम ठेविणारे महाराष्ट्र राज्यच प्रथमचे ठरले. यशवंतरावानी मराठा तितुका| मेळवावा|| महाराष्ट्र धर्म वाढवावा|| हा पवित्रा दिल्लीपर्यंत जाईल तेथे सत्तावंत होऊन खरा केला. यशवंतरावांना ‘गुरूवाद’ कारण ते सांप्रदायिक नव्हते. तर्कतीर्थांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसाच्या वेळी तर्कतीर्थ हे माझे मित्र आहेत. हे शौर्यार्थाने वाई क्षेत्रात त्यांनीच सांगितले. यशवंतराव लोकशाही सामाजिक समतावादी होते. सामाजिक विद्वेष नाहीसा करण्यास ते कारणीभूत ठरले. “विश्वकोशाच्या संपादकाच्या जागेवर तर्कतीर्थांना नेमिले,” ही माझी चूक झाली नाही. ही निवड बरोबर ठरली, असे त्यानी प्रतिपादिले. डॉ. आंबेडकरांचे चरित्र लिहिण्याचाही त्यांचा मानस होता. दुर्दैवाने हे घडले नाही. तरी दलित प्रश्नाला यशवंतरावांनी दिलेले ‘योगदान’ अभूतपूर्व असे आहे. शिंदे व यशवंतराव राष्ट्रीय काँग्रेसवादी होते व भीमराव हे सहकारवादी-मवाळ-नेमस्त व प्रागतिक धोरणाचे राजकारणात ब्रिटिश असताना उगडपणे होते. फुले-शाहू यांना असेच सहकारवादी राहावे लागले. अंतरे का पडली यांचे उत्तर द्यावे लागते. तरी साम्ये होती. जिव्हाळा होता. शिंदे अर्थकारणात डावे होते. यशवंतरावांनाही समाजवादी लोकशाही हवी होती. केंद्रात असताना यशवंतरावांनी राखीव जागांची मुदत वाढविण्यास मान्यता दिली.

महाराष्ट्र नवा घडविण्याच्या कार्यात या सर्वांचे योगदान मोठे ठरते. यशवंतरावाचे व्यापक समाजकारण, विधायकता, रचनात्मकता या सर्व तत्समबाबी त्यांच्या पुढील महाराष्ट्राचे प्रत्यक्ष कार्यवाहित आणल्या तर ‘महाराष्ट्र’ हा नावाप्रमाणे महा-मोठा ठरून आदर्श होईल.