कथारुप यशवंतराव- मला टीका हवी आहे !

 मला टीका हवी आहे !

भाई माधवराव बागल हे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व लढवय्ये नेते होते. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांनी यशवंतरावांवर जहाल टीका केली होती, पण १ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाल्यावर ते काँग्रेस पक्षात आले. त्यांनी कोणत्याही अपेक्षेने पक्षप्रवेश केला नव्हता, तर काँग्रेस आणि यशवंतराव यांच्याविषयीचे त्यांचे मत बदलले, नवा महाराष्ट्र घडविण्याचे सामर्थ्य या पक्षात व या नेत्यामध्ये आहे असे त्यांना वाटले. पक्षप्रवेशाच्या वेळी साहेब गंमतीने त्यांना म्हणाले होते, ' माधवरावजी, तुम्ही बाहेर राहूनच काँग्रेसची जास्त सेवा कराल. आत येऊन टीका करण्याचे स्वातंत्र्य का गमावता ?' असेच एकदा साहेब कराडला मुक्कामी असताना माधवराव त्यांना भेटायला गेले. आत ते थकले होते. यशवंतरावांना ते म्हणाले, ' माझा काळ संपत आल्याच्या जाणिवेने मी तुमच्या भेटीला आलो आहे. मी काही मागायला आलो नाही. कुणाबद्दल चांगलं वाईट सांगायला आलो नाही. अलीकडे तुमची गाठ पडत नाही. माझीही प्रकृती बरी नसते. मी आलो आहे, फक्त म्हाता-याचा आशीर्वाद द्यायला. जातो. ' या त्यांच्या बोलण्यावर त्यांच्या हाताला धरून त्यांना खाली बसवीत यशवंतराव म्हणाले,

' बसा, असं म्हणू नका. मला लिहित जा, तुम्हाला जे वाटेल ते लिहित जा. तुमच्यासारख्या निस्वार्थी माणसानं लिहिलं नाही, तर मला तरी खरी वस्तुस्थिती कशी कळणार ? माझ्यावरही टीका करीत जा. मला टीका हवी आहे.'

सत्ताधा-यांना टीका आवडत नाही हा जगाचा अनुभव आहे, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना ज्येष्ठांना सांगत होते. ' माझे चुकले तर सांगत जा. मला टीका हवी आहे. '