कथारुप यशवंतराव-राजकारणात कधी कधी दोन घोडे लागतात !

राजकारणात कधी कधी दोन घोडे लागतात  !

यशवंतरावांनी आयुष्यात असंख्य भाषणे दिली. त्यांचे भाषण अतिशय मुद्देसूद व विचार प्रवर्तक असे. मात्र विरोधकांचे हल्ले परतावून लावण्याचे सामर्थ्यही त्यांच्या भाषणात होते. अर्थात हे करीत असताना त्यांनी सभ्यता आणि सुसंस्कृतपणा कधी सोडला नाही.

एकदा ' नवाकाळ ' दैनिकाच्या रोटरी मशीनच्या उदघाटन समारंभासाठी नामदार यशवंतराव , एस. एम. जोशी आणि कॉम्रेड श्रीपाद डांगे हे तिघे दिग्गज नेते एक व्यासपीठावर आले होते. अगोदर कॉ. डांगेंचे भाषण झाले. ते आपल्या भाषणात म्हणाले, ' आज हा ' नवाकाळ ' दैनिकाच्या रोटरीचा उदघाटन समारंभ आहे म्हणून मी आलोय. पण जर हा बिर्लांच्या रोटरीचा उदघाटन समारंभ असता तर मी आलो नसतो. एस. एम. ही कदाचित आले नसते, पण यशवंतरावजी नक्की आले असते.' यावर हशा व टाळ्या झाल्या. डांगे पुढे म्हणाले, ' संयुक्त महाराष्ट्र लढून आणला महाराष्ट्रातील जनतेने. मंगल कलश ज्यांनी आणायचा त्यांनी आणला. आमची तक्रार नाही. हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. पण इतिहासातील शिवाजी महाराज एका घोड्यावर स्वार होते. आता एकाचवेळी दोन घोड्यांवर स्वार होणारे शिवाजी आले आहेत. त्यांना समाजवादही हवा आणि भांडवलदारही हवा. ' हे वाक्य अर्थातच यशवंतरावांना उद्देशून होते. पुन्हा एकदा हशा व टाळ्यांचा गजर झाला.

नंतर यशवंतराव भाषणाला उभे राहिले. डांगेनी काढलेल्या चिमट्यांना ते काय प्रत्युत्तर देतात याची उत्सुकता सर्वांना लागली होती. भाषणाच्या सुरुवातीलाच साहेब हसत हसत म्हणाले, ' आमचे असू द्या. पण केरळमध्ये पहिले कम्युनिस्टांचे सरकार आले तेव्हा मुख्यमंत्री नंबुद्रीपाद यांनी बिर्लांना केरळमध्ये कारखाने काढायला बोलावले, हे लक्षात असू द्या. ' श्रोत्यांनी टाळ्यांचा प्रचंड गजर केला. साहेब पुढे म्हणाले, ' राजकारणात कधी कधी माणसाला दोन घोडे लागतात. आमचे काही कम्युनिस्ट मित्र नाही का, रशिया व चीन या दोन घोड्यांवर स्वार होत ?' या मार्मिक टोल्याने हशा व टाळ्यांनी सभागृह अक्षरश: दणाणून गेले. ज्या मैदानावर डांगेनी चौकार ठोकले त्याच मैदानावर साहेबांनी षट्कार खेचले. असे होते त्यांचे वक्तृत्व  !
असा होता त्यांचा हजरजबाबीपणा  ! !