कथारुप यशवंतराव- रसिक वाचक यशवंतराव !

रसिक वाचक यशवंतराव !

कवी सुधांशु यांनी मराठी भाषेत अनेक सुंदर भावकविता लिहिल्या. १९५८ साली त्यांचा ' जलवंती ' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्या कवितासंग्रहाची एक प्रत त्यांनी यशवंतरावांना भेट म्हणून पाठवली. त्यानंतर काही दिवसांनी घडलेला हा प्रसंग. यशवंतराव तेव्हा द्विभाषिकाचे मुख्यमंत्री होते.

एकदा लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. सरोजिनी बाबर सचिवालयात यशवंतरावांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. सरोजिनीताई केबिनमध्ये शिरल्या तेव्हा यशवंतराव एक छोटेसे पुस्तक वाचत होते. त्यांनी ताईंना बसायला सांगितले आणि ते पुस्तक वाचनात गढून गेले. अधुनमधून ते थांबत होते, खुणा करीत होते, हसत होते तसेच गंभीरही होत होते. काही वेळाने त्यांनी आपले वाचन थांबवले आणि सरोजिनीताईंना म्हणाले, ' आता बोला. ' ताई म्हणाल्या, ' तुम्ही काय वाचत होता, ते अगोदर सांगा.' साहेब म्हणाले , ' कवी सुधांशुंच्या कवितांचे पुस्तक वाचत होतो. फार सुंदर कविता आहेत. मला फार आवडल्या.

आईविषयीच्या कविता तर अंत:करणाला भिडणा-या आहेत. त्या वाचून मला माझ्या आईची आठवण होते. ' राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असताना, कामाचा व्याप सांभाळून वाचनाचा छंद जोपासणारे यशवंतराव इतर राजकारणी व्यक्तींपेक्षा वेगळे वाटत असत ते अशा छंदांमुळे. असे होते यशवंतरावांचे वाचन !