कथारुप यशवंतराव-मी येतोय !

मी येतोय !

१९५६ साली यशवंतराव महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले याचा सर्वांनाच आनंद झाला, पण कराडकरांना विशेष आनंद झाला. काम- धंद्याच्या निमित्ताने कराड परिसरातील काही लोक महाराष्ट्रभर विखुरले होते. १९५८ साली पुण्यात राहणा-या कराडकरांचे एक संमेलन घेण्याचा विचार पुढे आला आणि अध्यक्ष म्हणून यशवंतराव चव्हाण यांना बोलवायचे ठरले. त्यासाठी विद्याधर गोखले, आप्पासाहेब इनामदार, रामभाऊ गोगटे यशवंतरावांना भेटले. मुख्यमंत्र्यांनी तारीख दिली व त्याप्रमाणे सर्वजण तयारीला लागले. पण संमेलन दहा दिवसांवर आल्यावर यशवंतरावांच्या पी. ए. ची तार आली, की मुख्यमंत्री संमेलनाला येऊ शकत नाहीत. निमंत्रणपत्रिका तर वाटल्या गेल्या होत्या. आता काय करायचे ? शेवटी सर्वांच्या वतीने विद्याधर गोखलेंनी मुंबईला जाऊन यशवंतरावांशी समक्ष चर्चा करावी असे ठरले. त्याप्रमाणे गोखले मलबार हिलवरील यशवंतरावांच्या बंगल्यावर गेले, पण सचिव श्रीपाद डोंगरे यांनी त्यांना आत सोडले नाही. शेवटी गोखलेंनी एक चिठ्ठी लिहिली, ' प्रिय साहेब , २२ सप्टेंबरचा पुण्यातला कार्यक्रम तुमच्या अध्यक्षतेखालीच व्हावा या उत्कट इच्छेने आलो होतो, पण भेट होऊ शकली नाही. संमेलन ठरलेल्या तारखेलाच होईल. तुम्ही आल्याल तुमच्या अध्यक्षतेखाली , न आल्यास अध्यक्षाविना.'

डोंगरेंकडे ही चिठ्ठी देऊन निराश मनाने गोखले पुण्याला परतले. मित्रांना काय आणि कसे सांगायचे ही चिंता त्यांना सतावत होती. पण ते घरी पोहोचताच संयोजन समितीचे सदस्य त्यांचे अभिनंदन करू लागले. गोखलेंनी गोंधळून विचारले, ' अरे कशाबद्दल अभिनंदन करताय ?' ' कशाबद्दल म्हणजे ? तू साहेबांचा होकार मिळविल्याबद्दल. ' २२ तारीख पक्की समजा ' अशी साहेबांच्या पी. ए. ची तार आत्ताच आम्हाला मिळालीय. ' गोखलेंना सुखद धक्का बसला. ठरल्याप्रमाणे यशवंतराव संमेलनाला आले. त्यादिवशी डोंगरे गोखलेंना म्हणाले, ' तुमची व साहेबांची एवढी ओळख आहे हे अगोदर नाही का सांगायचे ? तुम्ही गेल्यावर साहेब माझ्यावर किती भडकले ? बाबुराव गोखलेंचा मुलगा आपल्याकडे आला होता आणि तो आपल्या भेटीविना परत गेला, ही गोष्ट साहेबांच्या मनाला फार लागली. त्यांनी ताबडतोब मला होकाराची तार करायला सांगितली.'