कथारुप यशवंतराव- प्रसंगी अखंडित वाचीत जावे !

प्रसंगी अखंडित वाचीत जावे !

डॉ. माधव गोडबोले हे भारतीय प्रशासन सेवेतील एक बुद्धिमान अधिकारी होते. त्यांनी प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला असून सध्या ते सामाजिक व राजकीय विषयांवर उदबोधक लेखन करीत असतात. प्रशासनात काम करीत असताना यशवंतरावांचे खाजगी सचिव म्हणून काम करण्याची संधी त्यांना लाभली होती. दररोज रात्री आठ वाजता गोडबोले सगळ्या फाईली पेटीत घालून ती पेटी यशवंतरावांच्या निवासस्थानी स्वाक्षरीसाठी पाठवत असत. दुस-या दिवशी सकाळी आठ वाजण्यापूर्वी त्या फाईली योग्य त्या शे-यांसह गोडबोले यांच्या टेबलावर परत येत असत. यशवंतराव रात्री अकरानंतर सलग २-३ तास काम करीत असत. एखाद्या महत्त्वाच्या फाईलसंबंधी अधिक चर्चा करायची असेल, तर ती फाईल ते ठेवून घ्यायचे. फाईलींचा तातडीने निपटारा करणे ही यशवंतरावांची सवय होती. त्यांचे ऑफीस मधील टेबल नेहमी स्वच्छ व चकचकीत असे. भेटीसाठी लोक आलेले नसतील, तेव्हा ते एखादे चरित्र अगर कादंबरी वाचत बसायचे.

एके दिवशी सकाळी आठ वाजून गेले तरी साहेबांकडून फाईली परत आल्या नाहीत. असे कधी होत नसे. गोडबोलेंना वाटले, बहुतेक यशवंतरावांची तब्येत बरी नसेल. त्यांनी यशवंतरावांचे स्वीय सहाय्यक डोंगरेंकडे चौकशी केली. डोंगरे म्हणाले, ' साहेब ठीक आहेत.' तरीही यशवंतराव ऑफिसात आल्यावर गोडबोले म्हणाले, ' साहेब, तुमची तब्येत ठीक आहे ना ?' यशवंतरावांना हा प्रश्न अनपेक्षित होता. ते म्हणाले, ' ठीक आहे, पण असे का विचारताय ?'

' काही नाही, रात्री सहीसाठी पाठविलेल्या फाईली सकाळी परत आल्या नाहीत म्हणून विचारलं ! '

गोडबोलेंच्या प्रश्नाचा रोख लक्षात आल्यावर यशवंतराव हसून म्हणाले, ' प्रसिद्ध लेखक ना. सी . फ़डके यांनी त्यांचे आत्मचरित्र मला पाठवले आहे आणि त्यांना माझी प्रतिक्रिया हवी आहे. रात्री जेवणानंतर मी ते वाचायला सुरुवात केली आणि त्यात इतका रंगून गेलो की पहाटे पाच वाजता ते वाचून संपले, तेव्हा फिरायला जाण्याची वेळ झाली होती !

त्यामुळे फाईली पहायचे राहूनच गेले. ' दिवसभराच्या श्रमाने थकून विश्रांती घेण्याऐवजी अख्खी रात्र जागून वाचन करणारे यशवंतराव एक श्रेष्ठ वाचक होते.