कथारुप यशवंतराव-माझ्या विचारांचा केंद्रबिंदू सामान्य माणसे आहेत !

माझ्या विचारांचा केंद्रबिंदू सामान्य माणसे आहेत !   

संरक्षणमंत्री असताना यशवंतराव एकदा नगर जिल्ह्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. आण्णासाहेब शिंदे, आबासाहेब निंबाळकर इत्यादी नेते त्यांच्याबरोबर होते. कार्यक्रम सुरू झाला. सभेला प्रचंड गर्दी जमली होती. सर्वांना बसण्यासाठी जागा अपुरी पडत होती. अनेक लोक टाचा उंचावून यशवंतरावांना पहात होते. त्यांचे विचार कानात साठवत होते. कार्यक्रम संपल्यावर यशवंतराव निघाले. मंडपातील अफाट गर्दी रस्त्याच्या दुतर्फा उभी राहिली. गर्दीला अभिवादन करीत यशवंतराव गाडीकडे निघाले होते व सामान्य माणसांची ती गर्दी यशवंतरावांना नमस्कार करीत होती. अनेकांना यशवंतरावांचा चेहराही दिसत नव्हता, पण त्यांना पाहण्यासाठी सर्वांची धडपड चालू होती. गाडीत बसल्यावर आण्णासाहेब शिंदेनी यशवंतरावांना विचारले, ' साहेब, तुम्ही दिसणार नाही हे माहित असूनही लोक तुम्हाला पाहण्यासाठी गर्दी करतात, असे का ?'

यशवंतराव अंतर्मुख होऊन म्हणाले, ' आण्णासाहेब, तुम्ही फार मूलभूत प्रश्न विचारला आहे. त्या माणसांना मी दिसणार नाही, पण ती माणसे माझ्या विचारांचा केंद्रबिंदू आहेत. त्यांचे आणि माझे विचार मिळते जुळते आहेत. ते जे विचार करतात, त्यांच्या ज्या आशा - आकांक्षा आहेत त्या, आणि मी जो विचार करतो त्यात साम्य आहे. आणि म्हणूनच मी दिसत नसलो तरी ती माणसे माझ्यासाठी उभी आहेत.'

नेता आणि जनता यांच्या संबंधाविषयी यशवंतरावांनी अत्यंत मार्मिक शब्दांत व्यक्त केलेला हा अभिप्राय त्यांच्या कुशाग्र बुद्धीचेही दर्शन घडवितो. यशवंतरावांचा हात सदैव जनतेच्या नाडीवर होता हेच यातून दिसून येते.