कथारुप यशवंतराव- कवीचे स्वागत

कवीचे स्वागत

कवी सुशांधू यांनी सांगितलेली ही आठवण . एकदा आकाशवाणीच्या काही कामानिमित्त ते मुंबईला गेले होते. मुंबईला आलोच आहोत तर यशवंतरावांना भेटावे असा विचार त्यांनी केला आणि यशवंतरावांना भेटण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर गेले. एखाद्या मंत्र्याच्या बंगल्यावर जाण्याचा पहिलाच प्रसंग असल्याने ते काहीसे बावरले होते. त्यांनी त्यांच्या नावाची चिठ्ठी आत पाठवली आणि बोलावणे येण्याची वाट पहात बसून राहिले आणि काय आश्चर्य ! स्वत: यशवंतरावच त्यांच्या स्वागतासाठी दाराशी आले. त्यांनी त्यांचे प्रेमाने स्वागत केले . आत घेऊन गेले. आपल्या शेजारी बसवले आणि आत जाऊन वेणूताईंना कविराज आल्याचे सांगितले. वेणूताई बाहेर आल्या व सुधांशूना पाहताच, ' अगं बाई....! साक्षात् दत्त दिगंबरच आले की ! ' असे म्हणून नम्रतेने त्यांना नमस्कार केला. सुधांशु औदुंबरचे होते आणि ' दत्त दिगंबर दैवत माझे ' हे त्यांचे गाणेही प्रसिद्ध होते. पण साक्षात् मुख्यमंत्र्यांच्या घरी झालेल्या या अनपेक्षित स्वागताने सुधांशू भारावून गेले.