कथारुप यशवंतराव- हे अश्रू ' त्या ' दु:खाचे आहेत !

हे अश्रू ' त्या ' दु:खाचे आहेत !

२ जून १९४२ रोजी यशवंतरावांचा विवाह झाला. दिव्यासारख्या लखलखणा-या तेजस्वी डोळ्यांच्या वेणूताई सोनपावलांनी त्यांच्या आयुष्यात आल्या. लग्नानंतर तीन वर्षांनी वेणूताईंनी एका कन्येला जन्म दिला. पण दुर्दैवाने अपत्यजन्माचा हा आनंद चव्हाण कुटुंबाला फार काळ साजरा करता आला नाही. ते बाळ अल्पायुषी ठरले.

सन १९४५ मध्ये वेणूताईंना क्षयाची बाधा झाली. त्यांची तब्येत प्रमाणाबाहेर खालावली. डॉक्टरांनी सांगितले की, यापुढे वेणूताईंना अपत्यसंभव नाही. त्यामध्ये त्यांच्या जीवाला धोका आहे. चव्हाण कुटुंबियांवर जणू वीजच कोसळली. भरल्या गोकुळाचे स्वप्न पाहणा-या वेणूताईंना आणि यशवंतरावांना समोर फक्त अंधार आणि अंधारच दिसू लागला, पण त्यांनी एकमेकांना सावरले. काळ हळू पावलांनी पुढे सरकत राहिला. यशवंतरावांच्या अनेक हितचिंतकांनी त्यांना दुसरा विवाह करण्याचा सल्ला दिला. एकदा तर खुद्द वेणूताईंनीच त्यांना दुसरा विवाह करण्याचा आग्रह केला. पण यशवंतरावांनी स्पष्ट सांगितले , ' दुस-या विवाहाची कल्पना सुद्धा मी करू शकत नाही.'

त्यानंतरही अनेक वर्षे निघून गेली. एकदा महाबळेश्वरला काँग्रेस कार्यकर्त्यांचे शिबीर भरले होते. यशवंतराव तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांचे दोन जीवलग मित्र किसन वीर आणि वसंतदादा पाटील यांनी या विषयावर यशवंतरावांशी बोलायचे ठरविले. एका संध्याकाळी खोलीत फक्त तिघेच असताना वसंतदादा व किसन वीर यांनी दुस-या विवाहाचा विषय काढला. ' भविष्याचा विचार करून भावनाप्रधान न होता साहेबांनी दुस-या लग्नाचा गांभीर्याने विचार करावा ' असे मत त्यांनी मांडले. यशवंतराव खिडकीजवळ बसले होते. शून्यात दृष्टी लावून ते बराच वेळ शांत बसून राहिले. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वहात होते. काही वेळाने ते म्हणाले, ' मित्रांनो, तुम्हाला तुमचा मित्र समजला नाही याचं मला दु:ख आहे. हे अश्रू त्या दु:खाचे आहेत .'
यानंतर पुढे कधीही त्या दोघांनी साहेबांसमोर दुस-या लग्नाचा विषय काढला नाही.