यशवंतराव चव्हाण (114)

१९४६ ते १९७५ हा उन्नतीचा काळ यशवंतरावांच्या जीवनात बहारीचा गेला. एका पदावरून दुसर्‍या पदावर ते चढतच गेले. अनेक उच्च पदे त्यांनी समर्थपणे भूषविली. यशवंतराव म्हणजेच महाराष्ट्र, अशीच परिस्थिती त्या काळात होती. 'यशवंतराव बोले आणि काँग्रेस हाले' अशी अवस्था काँग्रेसची होती. संपूर्ण मराठा समाजाचे नेतृत्व त्यांच्याकडे आले होते. यशवंतरावांचे विरोधी जाण्याची कुणाची ताकद होत नव्हती. केंद्रीय नेतृत्वाने यशवंतरावांना राष्ट्रीय प्रवाहात नेले आणि तेथेही त्यांनी आपली वैशिष्ट्यपूर्ण छाप पाडली. लाघवी वाणी, गाढ वाचन, अभ्यासू वृत्ती यामुळे त्यांनी पार्लमेंटमध्ये विशिष्ट स्थान मिळविले. मराठी भाषेवर त्यांचे अपरंपार प्रेम होते. प्रभुत्व होते.

- ना. ग. गोरे

--------------------------

कै. यशवंतराव भारताचे अर्थमंत्री होते तेव्हा एकदा कर्‍हाडला आले होते. त्यांना भेटायला मी गेलो. यशवंतराव कर्‍हाडच्या विश्रामगृहात उतरले होते. आम्ही दोघे बोलत असताना एक वृद्ध स्त्री आपल्या फाटक्या लुगड्यात कांही तरी गुंडाळून घेऊन आली होती आणि तिला यशवंतरावांना भेटावयाचे होते. म्हातारपणामुळे ती कापत होती. पोलिसांनी तिला आडवले. यशवंतरावजींनी आपल्या खोलीतून ते पाहिले. त्यांनी तिला जवळ बोलावून घेतले आणि विचारले, ''कां आली होतीस आई ?''

म्हातारी कापर्‍या स्वरात म्हणाली, ''सारा गांव यशवंतरावाला नावाजतोय. तेव्हां त्याला भेटावं आणि हार द्यावा म्हून आली व्हते.''  त्या फाटक्या लुगड्यातून तिने हात बाहेर काढला आणि यशवंतरावाजींना दिला. यशवंतरावांनी तो हार घेतला आणि म्हातारीच्या गळ्यात घालून ते तिच्या पायी पडले. सौ. वेणूताईंनी म्हातारीला जेवू घातलं आणि मगच परत जाऊ दिले. यशवंतरावांजवळ फार माणुसकी होती. विरोधकांनी पातळी सोडून टीका केली, मानहानी केली तरी यशवंतरावांनी विरोधकांचा कधी राग केला नाही. विरोधकांना ते कधी टाकून-रागावून बोलले नाहीत. त्यांचा लोकसंग्रह फार मोठा होता.

-  भाई माधवराव बागल