यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व - ४२

या स्थितीत सामाजिक व आर्थिक प्रश्नांना प्राधान्य न देता खेरांनी शालेय शिक्षणातून इंग्रजीचा अभ्यासक्रम कमी करून काही पिढ्यांचे कायमचे नुकसान केले. महाविद्यालय, वैद्यकीय व वकिलीचे शिक्षण अशा क्षेत्रांतील इंग्रजीचा वापर कमी होमार नव्हता. तेव्हा शालेय शिक्षणात तो कमी करून काय साधणार होते? शहरातील विद्यार्थी व श्रीमंत कुटुंबांतील विद्यार्थी शिकवण्या लावून वा मिशनरी शाळांत जाऊन सोय करून घेऊ शकत होते. पण इतरांना ती उपलब्ध नव्हती. या असल्या दिखाऊ भाषाभिमानाचे यशवंतरावांना आकर्षण नव्हते. दुसरा परिणाम असा झाला की, सरकारी कारभारयंत्रणा व खाजगी कंपन्या यांच्यात इंग्रजीचा वापर होत राहिल्यामुळे, त्यात परप्रांतीय, विशेषत:दाक्षिणात्यांचा, भरणा होऊ लागला. खेर व मोरारजी हे स्वत:स गांधीवादी मानत. यामुळे त्यांनी दारूबंदीचे धोरण अमलात आणले. यामुळे दारू बंद झाली नाही, ती भूमिगत झाली. यातून गुन्हेगारी आणि काळा पैसा यांना मुबलक वाव मिळाला. अमेरिकेत दारूबंदीचा प्रयोग झाला होता आणि तो सपशेल फसला होता. पण अमेरिकन व पाश्चात्त्य लोकांपेक्षा भारतीय हे आध्यात्मिक असल्याच्या अहंकारी व अवास्तव समजुतीमुळे मुंबई राज्यात दारूबंदी कायदा आला, पण तो यशस्वी झाला नाही व होणे शक्यही नव्हते.

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये वैचारिक संघर्ष झाल्यावर प्रथम शंकरराव मोरे बाहेर पडले आणि शे. का. पक्षाच्या स्थापनेसाठी खटपट करू लागले. केशवराव जेधे नंतर त्यांना जाऊन मिळाले. प्रांतिक काँग्रेसमधील मातबर अशा व्यक्ती संघटना गेल्यामुळे राज्यात काँग्रेसला आव्हान मिळाले होते. त्या वेळी यशवंतराव चव्हाण प्रांतिकचे चिटणीस होते. मध्यंतरी, म्हणजे १९५० साली, शंकरराव देव यांनी नाशिकला होणा-या काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविली होती. तीत त्यांचा पराभव झाल्यावर त्यांनी काँग्रेसचे सभासदत्व सोडून अपक्ष म्हणून विधायक कार्य करण्याचा निर्णय घेतला. तथापि राजकीय दृष्ट्या आणखी काही महत्त्वाच्या घटना याच काळात घडल्या होत्या, शे. का. पक्षाची स्थापना झाल्यावर अनेक ठिकाणी त्या पक्षातर्फे शेतक-यांचे मोर्चे, कामगारांचे संप इत्यादी चळवळ होऊ लागल्या. त्या आवरण्यासाठी सरकारकडून काही ठिकाणी गोळीबारही झाल्यामुळे शे. का. पक्षाच्या प्रचारास अधिक धार आली. बावन्न सालची निवडणूकही जवळ येत होती. तेव्हा राजकीय पक्ष जुळवाजुळव करू लागले. शे. का. आणि समाजवादी या दोन पक्षांच्या काही नेत्यांची, आचार्य अत्रे यांच्या खंडाळ्यातील बंगल्यावर एक बैठक ९ एप्रिल १९५० रोजी झाली. सामाजिक समता स्थापन करण्यासाठी दोन्ही पक्षांनी सहकार्य करावे असा निर्णय या बैठकीत झाला.

तसे पाहिले तर या बैठकीला काही अर्थ नव्हता. विश्वास नाईकनवरे यांनी शंकरराव मोरे यांच्यासंबंधी लिहिलेल्या पुस्तकात, खंडाळा इथे शंकरराव मोरे व समाजवाद्यांपैकी अशोक मेहता, ना. ग. गोरे, मधू लिमये इत्यादींची जी चर्चा झाली तिचा वृत्तान्त दिला आहे. दोन्ही बाजूंच्या नेत्यांत इतरही काही सामील होते. पण मुख्य भूमिका या चौघांची होती, असे वृत्तान्तावरून म्हणायला हरकत नाही. या चर्चेत मधू लिमये रशियासंबंधीच्या प्रश्नावरून बोलताना शंकरारावांना म्हणाले की, तुम्ही रशियाची व्याख्याच अशी केली आहे, की गैरसोयीच्या ख-या गोष्टी तिच्यामुळे अशक्यच ठराव्यात. याच रीतीने शंकरराव सतत रशियाची तरफदारी करताना, तर अशोक मेहता, नानासाहेब गोरे व मधू लिमये रशियाच्या अंतर्गत व परराष्ट्रविषयक धोरणावर टीका करताना दिसतात. शंकरराव म्हणाले की, शांततारक्षणार्थ मी रशियाशी जमवून घेईन; युध्द उद्भवल्यास आम्ही रशियाच्या बाजूने असू. नेहरू जर रशियाशी लढतील तर आम्ही नेहरूंच्या मागे असणार नाही. उलट युध्दाचे रूपांतर यादवीत करून अखेर रशियास मिळू. अशोक मेहता यांची यावर प्रतिक्रिया अशी : ही भयावह परिस्थती आहे्. (तिरकी टोपी ताठ मान, पृष्ठे ३३५-३६.)