यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व - ३९

मंत्रिमंडळात बहुजनसमाजास मिळालेले अल्प प्रतिनिधित्व आणि शेतकरी व कामकरी वर्गाच्या हिताचा कार्यक्रम जाहीर करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष, यामुळे जेधे व शंकरराव मोरे यांची निराशा झाली. केवळ या दोघांचीच ही प्रतिक्रिया नव्हती. यांत बहुजनसमाजातले इतरही आमदार व कार्यकर्ते होते. यांत भाऊसाहेब राऊत, नाना पाटील, तुळसीदास जाधव इत्यादी होते. यांनी मग काही बैठका मुंबईत व पुण्यात घेतल्या. यांत शेतकरी संघ स्थापन करण्याच्या प्रश्नावर चर्चा होत होती. या बैठकींना यशवंतराव चव्हाणही हजर होते. पुढे या गटाची वा संघाची घटना तयार करण्यासाठी समिती नेमण्यात आली. पण १९४७ च्या ७ जानेवारीस झालेल्या बैठकीस, यशवंतराव व सोनूसिंग पाटील यांनी विरोधी मत व्यक्त केले. एका बैठकीत यशवंतरावांनी या प्रकारचा गट जातीय आहे असे वाटू शकेल, अशी शंका व्यक्त केली. नवा पक्ष हा ब्राह्मणेतर पक्षाचा नवा अवतार होईल, असे त्यांना सुचवायचे होते. बैठकीला आचार्य अत्रे हजर होते. आहोत तर जातीयतेचा आरोप कसा येऊ शकतो, असा अत्र्यांचा प्रश्न होता. यावर तुमचे गटात स्थान कोणते, असा उलट सवाल यशवंतरावांनी विचारला तेव्हा त्यांना काही स्थान नव्हते हे कोण सांगमार ? इतकेच नव्हे, तर दुसरा प्रश्न असाही होता की, अत्रे या गटात किती काळ राहणार होते ?

ऑगस्ट महिना उजाडला आणि १५ तारखेची पहाट ही स्वातंत्र्याची पहाट उजाडली. यासाठी झालेल्या प्रदीर्घ स्वातंत्र्य आंदोलनात, यशवंतराव हे असंख्यांपैकी एक सैनिक होते. यामुळे स्वातंत्र्यदिनाच्या वेळी त्यांच्या भावना काय असतील याची कल्पना केलेली बरी! पहिल्या स्वातंत्र्यदिनास यशवंतराव संसदीय सचिव या भूमिकेत सचिवालयावर हजर होते. मुंबईत व इतरत्र आनंदाने जल्लोश चालू होता आणि रात्री झालेल्या रोषणाईने मुंबई तर एक स्वप्ननगरी झाली. होती लोकांच्या झुंडीच्या झुंडी मुंबईभर फिरत होत्या. आदल्या रात्री मध्यरात्रीच्या ठोक्याला स्वतंत्र भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संसदेत भाषण केले; ते देशातल्या लाखो लोकांनी आकाशवाणीवरून ऐकले आणी ते भारावून गेले.

भारताच्या सरकारपुढे प्रचंड समस्या उभ्या झाल्या होत्या. अन्नधान्याची मोठी तूट होती आणि केरोसिनसुध्दा पुरेसे मिळणे अशक्य होते. त्याची आयात करण्यासाठी ब्रिटिश सरकारला विनंती करण्याची वेळ आली होती. फाळणीपूर्वीच जातीय दंगली सुरू झाल्या होत्या आणि निर्वासितांचे लोंढे नियोजित पाकिस्तानी प्रदेशातून भारतात येत होते आणि भारतातून पाकिस्तानी भागांत जात होते. पूर्व बंगालमधील हत्याकांडाने तर सीमा गाठली होती. खुद्द दिल्लीतच कत्तली होत होत्या. यामुळे महात्मा गांधींनी आमरण उपोषण सुरू केले. निर्वासितांना व अल्पसंख्याकांना संरक्षण देण्यासाठी हे उपोषण होते. यातच पाकिस्तानला फाळणीच्या योजनेप्रमाणे पन्नास कोटी रूपयांची रक्कम द्यायची असता, ती सरकारने थोपवून धरली होती. पण गांधीनी उपोषणासाठी हाही एक मुद्दा केल्यामुळे हिंदुत्वनिष्ठ संतप्त झालेच, शिवाय अनेक काँग्रेसजनांनाही धोरण अमान्य होते.

देशात कमालीची अस्थिर परिस्थिती होती. मिळालेले स्वराज्य कसे टिकवायचे हा खरा प्रश्न होता. देशातल्या ज्वालाग्राही वातावरणात, १९४८ सालच्या जानेवारीच्या तीस तारखेला महात्मा गांधीचा दिल्लीत प्रार्थनासभेत खून झाला. याची महाराष्ट्रात वेगळी व तीव्र प्रतिक्रिया झाली. खून करणारा नथुराम गोडसे व त्याचे साथीदार हे हिंदुमहासभा, रा. स्व. संघ इत्यादींचे कार्यकर्ते होते आणि ते ब्राह्मण होते. तेव्हा महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागांत ब्राह्मणांची घरेदारे लुटण्यात व जाळण्यात आली. जमावापुढे पोलिस कमी पडत होते आणि गुप्तहेर संघटनेला खून करणा-यांच्या कटाचा काही सुगावा लागलेला नसल्यामुळे नंतरच्या बंदोबस्तातही सरकारी यंत्रणा अपुरी पडली. हे होत असताना अखिल भारतीय काँग्रेसचे चिटणीस असलेले शंकरराव देव, खासदार काकसाहेब गाडगीळ आणि महाराष्ट्र प्रांतिक