यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व - ४०

समितीचे अध्यक्ष केशवराव जेधे; दिल्लीतच आठएक दिवस राहिले. दंगलग्रस्त भागास त्यांनी भेट द्यायला हवी होती. खेर-मोरारजीही मुख्यमंत्री व गृहमंत्री या नात्याने दौ-यावर गेले नाहीत. कराडजवळील ओगलेवाडी इथे एका बैटकीतील चर्चेत भाग घेत असताना, यशवंतरावांना गांधींच्या खुनाची बातमी समजली. ते लगेच कराडला गेले आणि पुढील आठदहा दिवस त्यांनी तिथेच मुक्काम करून, कराडला हिंसाचार व जाळपोळ यांपासून वाचवले. अर्थात सातारा जिल्हा पेटला होता. यशवंतरांवांनी सांगितले की, कराड वाचवत असताना इतर गावांसंबंधी शक्य तितके आपण केले, पण पोलिस कमी व दंगल वणव्यासारखी पसरलेली. आठदहा दिवसांनी ते मुंबईला गेले आणि त्यांनी मोरारजीभाईंना जिल्ह्यातील घटनांची माहीती दिली. प्रांताच्या काही भागातल्या दंगलीबाबत केशवराव जेधे, शंकरराव मोरे इत्यादींना जबाबदार धरण्याचा प्रयत्न काहींनी केला, पण हा या दोघांवर अन्याय होता. अशा वातावरणात काँग्रेसमधल्याच ब्राह्मण व ब्राह्मणेतर पुढा-यांनी संयम दाखवायला हवा होता, पण त्यांच्यापैकी काहींनी अविवेकी भाषा वापरली आणि आगीत तेल पडले. हे सर्व दुर्दौवी होते.

महात्माजींच्या खुनानंतर महाराष्ट्रात अस्वस्थता वाढली असताना शेतकरी- कामक-यांचा कार्यक्रम जाहीर करा, काँग्रेसला समाजवादी बनवा इत्यादी मागण्या अप्रासंगिक होत्या. देशव्यापी राजकारणाच्या संबंधाकडे दुर्लक्ष करून घेतलेली ही भूमिका होती. अर्थात तिला लोकमताचा पाठिंबा मिळाला नाही, असे नव्हे. तथापि ही भूमिका घेऊन काँग्रेसचा त्याग करण्याच्या तयारीत महाराष्ट्र काँग्रेसमधील काही शेतक-यांचे प्रतिनिधीच नव्हते, तर काँग्रेसमधील समाजवादी गटही १९४८ च्या मार्चमध्ये काँग्रेसमधून बाहेर पडला. त्यापाठोपाठ काँग्रेसमध्ये हा जो पुरोगामी गट तयार झाला होता त्याने काँग्रेस सोडण्याचे जाहीर केले. एक मात्र खरे की, शंकरराव देव यांनी संघटनेच्या तर बाळासाहेब खेर व मोरारजी देसाई यांनी मंत्रिमंडळाच्या पातळीवर सामाजिक जाणीव व दूरदर्शीपणा दाखवला असता, तर काँग्रेसमधून निदान हा शेतक-यांचा पक्ष घेणारा गट कदाचित बाहेर पडला नसता.

या पक्षास शंकरराव मोरे यांचे वैचारिक नेतृत्व लाभले होते. तर नाना पाटील, केशवराव मोरे यांच्यावर मार्क्सवादी विचारांचा प्रभाव होता आणी त्याच वेळी चीनमध्ये माओच्या नेतृत्वाखालि कम्युनिस्ट पक्ष सत्तधारी झाला: तेव्हा शंकररावांप्रमाणे अनेक डाव्या विचारांच्या भारतातही तशीच क्रांती करण्याची स्वप्ने पडू लागली. दोन्ही देशांतली परिस्थिती, सत्ताधारी नेतृत्वांतील तफावत आणि क्रांती करण्यासाठी स्वपक्षाची कितपत ताकद आहे यांपैकी कशाचाच विचार न करता; ही क्रांतीची महत्त्वाकांक्षा शंकरराव व त्यांचा पक्ष आणि कम्युनिस्ट पक्षातलेही काही बाळगत होते. पण दोन्हींच्या पदरी अपयशच आले.

महाराष्ट्रातील परिस्थिती काँग्रेसची शक्ती खच्ची करू शकेल आणि शे. का. पक्ष जातीय प्रचार करून बहुजनसमाजाची दिशाभूल करील हे लक्षात घेऊन, ३० मार्च १९४८ रोजी मुंबई काँग्रेस कार्यकर्त्यांचा एक मेळावा भरवण्यात आला. त्यास राज्यातले जवळजवळ पाऊणशे प्रमुख काँग्रेसजन हजर होते. त्यात बरीच चर्चा होऊन धोरणात्मक अशा पत्रकाचा मसुदा तयार करण्यात आला आणि ज्यांना तो मान्य असेल त्यांनी आपली सही करून, यशवंतराव चव्हाण यांच्या पत्त्यावर आपली संमती कळवावी असे सांगण्यात आले. ठरावाचा मसुदा पाहिल्यास काँग्रेस पक्षासंबंधात यशवंतराव तोपर्यत घेत असलेल्या भूमिकेशी मिळताजुळता होता हे लक्षात येईल.

तो मसुदा असा : ‘सत्तासंक्रमणानंतर जनतेच्या आशा- आकांक्षा वाढतात, वाढवल्या जातात. त्या फलद्रूप होण्यासाठी काँग्रेस पक्ष सामर्थ्यवान व शिस्तबध्द बनणे हाच एक उपाय आहे. काँग्रेसला शेतकरी-कामकरी यांचे राज्य स्थापन करायचे आहे. भांडवलशाही वृत्तीचा बीमोड करून शोषणरहित समाजा निर्माण कारायचा आहे. हे बदल चुटकीसरशी होणे शक्य नाही व दांडगाई करणे इष्ट नाही, अशी महात्मा गांधींची आदर्श स्वराज्याची कल्पना होती. आमची संस्कृती, नीतीमत्ता आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोण हा विशिष्ट प्रकाराचा आहे. स्वातंत्र्य हे नुसत्या हे नुसत्या भौतिक शक्तीवर उभारता येत नाही, टिकवता येत नाही. जनतेच्या नैतिक शक्तीवरच ते टिकविता येते. म्हणून आदर्श लोकशाहीप्रधान राजकारणात, समाजकारणात अगर अर्थकारणात जे जे बदल घडवून आणायचे आहेत, ते काँग्रेसला आपल्या प्रवृत्तीला अनुसरूनच आणायचे आहेत. याच पध्दतीने घडलेले बदल हे चिरस्थायी होतील व राष्ट्राची शक्ती वाढवतील.