यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व व कर्तृत्व - ३५

सातारा जिल्ह्यात पत्री सरकार खूनबाजीत गुंतले असून निरपराध लोकांचा छळ व हत्या होत असल्याच्या बातम्या ऐकल्यावर, अच्युतरावांनी भाऊसाहेब नेवाळकर यांना अहवाल देण्यासाठी साता-यात धाडले होते. कासेगावकर-वैद्य व इतरांनी नेवाळकरांना निरनिराळ्या भागांत फिरवले. हे सर्व गुप्तपणे करायचे होते. अनेकांशी नेवाळकरांच्या भेटी झाल्या. तेव्हा त्यांचे समाधान झाले, असे कासेगावकर- वैद्य यांनी लिहिले आहे. या आंदोलनाच्या काळात ग्रामीण भागातील सावकार, सरकारी अधिकारी अशांपैकी जे उघड अन्याय करत होते त्यांना आंदोलकांनी शासन केले. अनेक पडून राहिलेली न्यायालयीन प्रकरणे निकालात काढली. पत्र्या मारणे या प्रकाराबद्दल गैरसमज पसरला होता तळपायावर दंडुक्यांनी मारणे याचा अर्थ पत्री मारणे असा होता. या आंदोलनाचा फायदा काही भागांत काही रामोशांनी व दरोडेखोरांनी घेतला. ते ‘गांधी महारजकी जय’ अशा घोषणा देत लूटमार करत. त्यामुळे स्वातंत्र्यसैनिकच यात गुंतल्याची हवा पसरली. इतके मात्र खरे की, बेचाळीस आंदोलनात भाग घेऊन सातारा जिल्ह्यात जे चारपाच गट काम करत होते, त्यांत सामील असलेल्या काहींनी स्वातंत्र्यानंतरही हिंसाचार चालू ठेवला. गटबाजी व खूनबाजी हे सत्र काही काळ चालले. ते मुख्यत: वाळवा तालुक्यात होते. ते थांबण्याची चिन्हे दिसेनात तेव्हा आचार्य जावडेकर यांनी एक लेख लिहून याकडे लक्ष वेधले. मग मुंबई सरकारने उपाययोजना केली.

१९४५ साल उजाडल्यावर राजकारण वेगळे घेणार अशी घेणार अशी चिन्हे दिसू लागली. महात्मा गांधी पाचगणी इथे विश्रांतीसाठी आले होते. सातारा जिल्ह्यात झालेल्या स्वातंत्र्य- आंदोलनाची माहीती त्यांना देण्यासाठी भाऊसाहेब सोमण व यशवंतराव गांधीजींना भेटले. गांधींनी दिलेल्या अर्ध्या तासात कार्यकर्त्यांची बाजू त्यांना सांगण्यात आली, यशवंतराव लिहितात, “सर्व ऐकून घेतल्यावर गांधीजीनील आम्हांला सांगितले, “ मी या संबंधाने सगळे ऐकले आहे, या चळवळीत काम करणारे सर्व देशभक्त आहेत, हे मी मान्य करतो. त्यांच्या पध्दती ह्या माझ्या पध्दती नाहीत, हेही मला स्पष्ट केले पाहिजे.” आम्हांला एवढेही पुरे होते. गांधीजींच्या तोंडून भूमिगतांच्या कार्यक्रमाला आशीर्वाद मिळणे शक्य नव्हते आणि आवश्यकताही नव्हती. परंतु भूमिगतांच्या सर्व क्रियाशीलतेच्या पाठीमागे राष्ट्रीय स्वातंत्र्याची ऊर्मी होती, ही गोष्ट देशाच्या सर्वश्रेष्ठ नेत्याने मान्य केली, यात सर्व पोहोचले, अशी आमची भावना आहे.

त्यानंतर वृत्तपत्रांत पंडित नेहरूंची भूमिगत चळवळीसंबंधीची मुलाखत वाचली आणि अभिमानाने ऊर भरून आलं. ‘जेव्हा राष्ट्र दडपशाहीखाली दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जात होता, तेव्हा जनता जर बंड करून उठली नसती, तर आश्चर्य होते-अहिंसेचे हे प्रश्न हे तांत्रिक आहेत’, अशा अर्थाचे ते पत्रक त्यांनी काढले होते आणि भूमिगत चळवळीला आणि कार्यकर्त्यांना नैतिक पाठबळ दिले होते.’ (कृष्णाकांठ, पृ.३०३).

बेचाळीसच्या या आंदोलनासंबंधी गेल ऑम्वेट यांनी वेगळी मीमांसा केली आहे. ज्ञानेन्द्र पांडे यांनी द इंडियन नेशन इन १९४२ असे एक पुस्तक प्रसिध्द केले होते. १९४२ सालच्या आंदोलनात विविध राज्यांत कोणत्या प्रकारचे आंदोलन झाले, याची बरीच माहिती यात आहे. निरनिराळ्या लेखकांनी लिहिलेले लेख पांडे यांनी या पुस्तकात संग्रहित केले आहेत. महाराष्ट्रातील आंदोलनासंबंधी गेल ऑम्वेट यांचा लेख या संग्रहात आहे.

गेल ऑम्वेट या अमेरिकन. त्यांनी महाराष्ट्रातील सत्यशोधक समाज आणि बहुजनसमाज यांचा बराच अभ्यास केला असून त्यासंबंधी लिखाण केले आहे. पांडेसंपादित ग्रंथात इतर राज्यांत ४२ सालच्या आंदोलनात कोणत्या प्रकारचे आंदोलन झाले याची माहिती दिलेली असली तरी, ऑम्वेट यांनी असा सर्वांगीण आढावा न घेता, सातारा जिल्ह्यात पत्री सरकारची चळवळ कशा प्रकारे झाली, इतक्यापुरता आपला लेख मर्यादित केला आहे.

त्यांचे म्हणणे असे की, सातारा जिल्ह्यात पत्री सरकार स्थापन करून ब्रिटिश राज्ययंत्रणेला पर्यायी होईल, अशी व्यवस्था निर्माण केली गेली आणि इतर राज्यांतील आंदोलनापेक्षा साता-यातील हा प्रयोग अधिक काळ चालला. याचे कारण वा मूळ सत्यशोधक समाजाची जी चळवळ पश्चिम महाराष्ट्रात झाली, तीत दिसते पत्री सरकारचा प्रयोग करणारे नेते व कार्याकर्ते हे बहुतकरून सत्यशोधक चळवळीच्या संस्कारात वाढले होते. या चळवळीने सावकार, इनामदार इत्यादीविरूध्द जागृती निर्माण केली होती आणि त्यांच्या अन्यायाविरूध्द आंदोलनेही केली होती. यामुळे पत्री सरकार स्थापन करून, ब्रिटिश राज्ययंत्रणेला पर्याय निर्माण करून, एकप्रकारे सत्यशोधक समाजाच्या चळवळीचीच पुढची पायरी गाठण्यात आली.