यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र २४-१८०९२०१२-१

मुलाचे सारे करतो.
पंच पाचच का असतात ?
पाचामुखी परमेश्वर.
असे होय, छान.

लग्न ठरवणे, लग्न लावणे, लग्न मोडणे म्हणजे सोडचिठ्ठी घेणे, तंटेबखेडे सोडवणे हे सारे पंचायत करते.  जेव्हा निर्णय होत नाही तेव्हा मढी, माळेगाव, जेजुरी येथील जत्रांमध्ये महा पंचायत भरते.  तेथेही निकाल झाला नाही, दोन्ही पक्षकारांना तो पटला नाही तर आणखी एक आपील असते ते त्या तांड्यातल्या सर्वांत वृद्ध असलेल्या आजीकडे.  तिला म्हणतात भ्यार अम्मा.  आमच्या भाषेत असे वेगवेगळ्या जमातीत शब्द वेगळा असेल पण अंतिम निर्णय तिचा असतो.  तिला सर्व तंटा सांगितला जातो.  तो ती ऐकते आणि निर्णय देते.  तो अंतिम असतो.  त्याला अपील नाही.  पटण्या न पटण्याचा विषयच नसतो.  सारे श्रद्धापूर्वक निकाल ऐकतात आणि अंमलबजावणी होते.  कायदे मोठे कठोर असतात.  स्त्री-पुरुष संबंध मुक्त असतात.  बंदिस्त नसतात.  कोणत्याही स्त्रीला कोणत्याही क्षणी घटस्फोट मागता येतो.  तेथे वयाचा प्रश्न नाही.  कोणत्याही वयाच्या स्त्रीला तो मागता येतो.  लगेच दुसरे लग्न करता येते.  मुले अर्थातच मामाकडे जातात.  त्याने आमच्या या जमातीमध्ये बलात्कार नाही, अत्याचार नाही, अनैतिक संबंध नाहीत.  याला परवानगीही नाही.  फार जबर शिक्षा आहेत.  याउलट काडीमोड सोपी आहे.  कितीही लग्ने करता येतात.  योनीशुचितेच्या नसत्या फालतू कल्पना नसतात.  विधवा कोणी राहतच नाही.  नवर्‍याने सोडून दिले आहे असले काही नसते.  साहेब, परवा एक गमतीचा प्रसंग घडला, सांगू का ?

हं, सांगा ना.

पुण्यातल्या स्वारगेट एस.टी. स्टॅन्डवर सारे वैदू रात्री मुक्कामाला असतात.  दिवसभर पेट्या चाळणी, डबे, दुरुस्त करणारे पुरुष आणि घरोघर कटलरी विकणार्‍या स्त्रिया.  दिवसभर भिक्षा मागून जगत असतात.  रात्रीचा मुक्काम असतो एस.टी. स्टॅन्डवरल्या मोकळ्या जागेत.  अगदी बारा महिने हे लोक असेच उघड्या जागेवर झोपतात.  स्त्रिया-पुरुष आपआपल्या कुटुंबाचे नीतीनियम फार कडक पाळतात.  जातपंचायत फार जागरूक.  आपले यल्लाप्पा वैदू गुरुजी सातारचे.  ते यांचे पंचप्रमुख.  परवा गुरुजी आले ते घाईघाईने.  मला म्हणाले, चला, एका पंचायतीला जायचे आहे.  मोठा चमत्कारिक पेच आहे.  पण मी कशाला ?  चला तुमचीपण गरज आहे.  असला प्रसंग माझ्या तीस-चाळीस वर्षांत पंचायतीत आला नव्हता.  हडपसरच्या एका मोकळ्या जागेवर आम्ही पोहोचलो.  शंभर-दोनशे लाल फेटेवाले पुरुष, आखुड धोतरे, अंगात नुसत्या बंड्या, सारेच्या सारे काठीसारखे लांबसडक.  स्त्रिया काष्टा घातलेल्या, नऊवारीतल्या.  डोक्यावर पदर, दाताला बहुतेकजणीनी दातवाण लावलेले त्याने सर्व स्त्रियांचे दात जांभळे.  कपाळावर, गालावर गोंदलेले.  गुरुजी व मी पोहोचलो.  गुरुजींच्या नावाच्या घोषणा सुरू झाल्या.  साहेब हा माणूस या अडाण्यांच्या पंचायतीत तोंडाला फेस येईपर्यंत बोलतो.  तासन् तास, दिवस दिवस.  आम्ही गेल्याबरोबर सारे लगेच गोलाकार बसले.  स्त्रिया-पुरुष आमच्या पंचायतीत बसतात.  गुरुजींना लोकल पंचाने आरोपीसमोर उभे केले.  नुकतेच लग्न झालेली, दोन तरुण जोडपी.  पंचायती समोर उभी राहिली.  नितळ काळ्या रंगाच्या दोन तरुण मुली आणि दोन तरुण मुले.  यांनी काय केले असेल ?  मी उत्सुकतेने ऐकू लागलो.  त्यांच्या तेलगू भाषेत गुरुजींना सारी हकीकत पंचाने सांगितली.  रस्त्याने वाहतूक चालू होती.  लोकांची वर्दळ होती.  त्यातल्या कुणालाही काय चालले आहे ते समजत नव्हते.  गजबजलेल्या शहरात एखादे स्वतंत्र मानवी बेट असावे तसे यांच्या जातीपुरते बेट होते.  गुरुजी त्यांचे नाईक होते.  गुरुजी मला हळू आवाजात मराठीतून सांगू लागले.  एक वर्षापूर्वी या दोघा पोरांशी या दोन पोरींनी लग्न केली.  पंचायतीत मीच लग्न लावली.  आमच्या लग्नाला ब्राह्मण येत नाही.  मीच लग्न लावतो.  सत्यशोधक पद्धतीने.  यांचेही लग्न झाले, संसार सुरू झाला.  आमचे लोक एकत्र हिंडतात पाचपन्नास बिर्‍हाडे असतात. या दोन्ही जोड्यांचे संसार सुरू झाले, पण एक विचित्र गोष्ट घडू लागली.  दिवसभर या पोरी आपआपल्या नवर्‍याबरोबर असायच्या.  सारे व्यवहार उघड्यावर, रात्री मात्र उलटे व्हायचे ही मुलगी त्याच्याकडे आणि ती मुलगी याच्याकडे !  चौघांना सारे काही ठाऊक होते.  एक-दोनदा पंचाकडे तक्रार आली, पण हे काही कबूल करत नाहीत आणि आता लोकांच्या लक्षात आले आहे.  काय करायचे ?  दोन्ही घरे, त्यांचे आईबाप, नातेवाईक सारेच कायद्याने अडचणीत आलेत.  काय करायचे ?  ही पोरे तर कबूल होत नाहीत.  मोठा पेच.  कालवा, भांडणे, हमरीतुमरीवर.  गुरुजी मध्ये पडले.  सार्‍यांना एका जागेवरून हलायचे नाही असा हुकूम दिला.  सारे गप्प एका जागेवर बसून राहिले.  गुरुजी मला म्हणाले, चला.  आम्ही शेजारच्या टपरीवर गेलो.  गुरुजींनी दोन्ही पोरींना बोलावले.  हळूहळू मराठीतून विचारू लागले, तुमचे आपण तुमच्या पसंतीच्या मुलाशी लग्न लावून देवू.  पण खरे काय ते सांगा.