यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र २३-१७९२०१२-१

चव्हाणसाहेब खाजगी गप्पांतही आपली तळमळ कशी व्यक्त करीत.  बाबांचे माझे संबंध चव्हाणसाहेब गेले ना तरी तसेच होते.  मी करीत असलेल्या कामांचाही त्यांना फार अभिमान वाटे.  बाबासाहेबांनी घटना लिहिली त्याबद्दल त्यांना जगाने सलाम केलाय.  पण साहेब त्यांनी केलेले धर्मांतर युगप्रवर्तक नव्हे का ?  होय बाबा, मला तरी त्यांचे धर्मांतर म्हणजे युगांतर वाटते.  त्यांच्या जागेवर आपण उभे राहिलो ना तरच या वेदना, यातना समजतात.  जातिव्यवस्थेचे शिळे तुकडे ज्यांच्या वाट्याला आले त्यांनी का म्हणून तिचे समर्थक व्हावे ?  बाबा खरे सांगू आपण तरी का समर्थक व्हावे ?  कोकणातल्या माझ्या एका ब्राह्मण मित्रासोबत त्याचे घरी गेलो होतो.  लहान होतो, पण समजत होतच ना ?  मला काही माजघरात जाता येत नव्हते की त्यांचेबरोबर जेवता येत नव्हते.  बाहेर पडवीत मला जेवावे लागले.  जेवल्यावर माझे ताटही मीच घासले आणि जेथे बसलो होतो ती जागाही सारवावी लागली होती.  अर्थात माझा मित्र माझ सोबतच बाहेर जेवला आणि सारवूही लागला ते वेगळे.  पण तो जो सल मनात राहिला ना तो तसाच आजही इतक्या वर्षांनी राहिला आहे.  आपल्याला कुणीतरी तुच्छ लेखते आहे.  आपला स्पर्श अशुद्ध आहे.  ही भावनाच मोठी दुःख देणारी आहे.

संभाजीबाबा म्हणाले, साहेब, आजही तसेच आहे.  अस्पृश्यता ही पायरीपायरीने पाळली जाते.  आमच्या गावतल्या मंदिरात गर्भगृहात पूर्वी आम्हाला जायला बंदीच होती.  तेथे ब्राह्मण असे.  आणि तेथेही गम्मत होती.  मंदिर स्वच्छ ठेवायचे, धुऊनपुसून घ्यायचे ते गुरवाने.  जोवर मंदिर धुऊनपूसून होत नाही तोपर्यंत ब्राह्मण देवळात जात नसे.  सारे झाले की ब्राह्मण गुरवाला विचारी, झाले तुझे, पुसून टिपून झाले.  ये बाहेर, मग उंबर्‍यावर आपल्या कमंडलूतले पाणी मंत्र म्हणीत टाकी.  गाभार्‍यातही पाणी शिंपडे.  मग देऊळ शुद्ध झाले !  पुन्हा ब्राह्मण असेपर्यंत गुरवही गर्भगृहात जात नसे.  मग कुणबी तर कुठले ?  ते गर्भगृहाच्या उंबर्‍यापर्यंत.  बाकी सारे सवर्ण लोक मंदिराच्या मंडपात असत.  अस्पृश्य लोक मंडपाबाहेर पायरीच्या पलिकडे उभे असत.

मी मध्येच म्हणालो, बाबा, जरा एक मिनिट.  चव्हाणसाहेब जरा चमकले, हा काय बॉम्ब टाकेल म्हणून.  गावातले नेते म्हणवणारेही होते ना गप्पांमध्ये.  मी बाबांना विचारले, की 'बाबा, मंदीराचा पाया कोण काढते.  दगडी चिरे कोण घडवते ?  मंदिराचे बांधकाम कोण करते ?  ती सुंदर लेणी, सुंदर नक्षीकामे कोण करते ?  आणि सुंदर खांब कोण करते ?  आणि शिखरांपासून कळसांपर्यंत सारी कलाकुसर कोण करते ?  देवाची सुंदर मूर्ती कोण करते ?  सभामंडप कोण बांधते ?  सांगा ना.'

बाबा म्हणाले, कारागीर
बाबा कारागीर अशी जात आहे का ?

नाही, पाथरवट, वडार, कैकाडी ही कामे करतात.  पाया खोदण्याचे काम कैकाडी, त्याची गाढवे करतात.  दगड फोडणे, चिरे करणे, कोपरे घडवणे, बांधकाम करणे अगदी कळसापर्यंतची कामे पाथरवट करतात.

बाबा यापैकी कुणाला मंदिर बांधून झाल्यावर मंदिरात जाता येते ?  आम्हीच छन्नी हातोड्यांनी दगडाने कोरतो ना तो देव ?  म्हणजे त्याचे बाप कोण ?  आम्हीच ना ?  पण तुमचा भटजी येतो, त्याच्या तांब्यातले पाणी शिंपडतो, मंत्र म्हणतो आणि तुमचा भित्रा देव मंत्रांना घाबरून आम्ही घडवलेल्या मूर्तीत प्रवेश करतो.  त्याला प्राणप्रतिष्ठा असे सुंदर नाव देतो.  आणि ज्या क्षणाला देव दगडात प्रवेश करतो त्या क्षणाला आमची हकालपट्टी होते.  मग मात्र आम्ही काही पायरीला शिवू शकत नाही.  त्या देवाला आम्ही घडवले हे त्यास कळत कसे नाही.  साधा स्पर्श झाला तरी मरणाचा मार खावा लागतो.  बहिष्कार पडतात.  अन्याय, अत्याचार होतात, बाबा, हजारो वर्षे हे चालू राहते.  यात कुणाला अन्याय वाटत नाही.  तेहतीस कोटी देव आम्हाला समजू शकले नाहीत ते काम बाबासाहेबांनी केले.

गावकरी लगेच म्हणतात.  साहेब पाने वाढलीत चला.  दोन घास घ्या.  मग चर्चा चालू दे.  आम्ही सारे उठलो.  जेवायला बसलो.  साहेबांच्या आणि संभाजीबाबांच्या मध्ये साहेबांनी मला बसवले.  लक्ष्मणचा हा परखडपणा बाबा आपल्या लोकांना थोडा टोचेल, पण सत्यच आहे ना ?  जेवणे झाली.  आम्ही कराडला परत निघालो.  साहेब आता कोणत्याच सत्तेच्या जागेवर नव्हते.  लाल दिव्याची गाडी नव्हती.  दिमतीला कुणी भालदार, चोपदार नव्हते की अफाट गर्दीही नव्हती.  तुरळक माणसे असत.  त्यांच्याच वयाची.  मित्र म्हणावीत अशी.  उगवत्या सूर्याला नमस्कार करणारच फार.  आम्ही त्यांच्या घरी आलो.  साहेब, विश्रांती घेणार का थोडावेळे ?  शामराव म्हणाले, नाही, नाही.  लक्ष्मणराव, मी जाऊन येतो तोवर तुम्ही थांबा.  कुणीतरी बरोबर असलेले बरे.  मी हो म्हणालो.  शामराव बाहेर गेले.