शब्दाचे सामर्थ्य १८७

याउलट, रा. स्व. संघाचे महाराष्ट्रातले आणि बाहेरचे स्वरूप मी पाहिले आहे. त्यामुळे या संघटनेत एकाच जातीचे लोक आहेत, असे मी म्हणू शकत नाही. जनसंघाचेही तेच आहे. समाजातले निरनिराळे वर्ग त्यात आहेत, याचीही मला माहिती आहे. व्यक्तिगत उल्लेख करायचा, तर पुण्यात मी जेव्हा वकिलीचा अभ्यास करायला आलो, त्या वेळी लॉ कॉलेजसमोर, जिथे मी राहत असे, तेथे माझा 'रूम पार्टनर' हा रा. स्व. संघाचा सचोटीचा कार्यकर्ताच होता. माझ्या मित्रमंडळींतही अशांचा भरणा होता. तेव्हा संघ - जनसंघावरील माझी टीका म्हणजे ब्राह्मण वर्गावर, एका जातीवर टीका, असे भासविण्याचा प्रयत्‍न जेव्हा माझ्या बाबतीत होतो, तेव्हा मला त्याचे हसू येते.

कारण माझी टीका असते, ती विचारसरणीवर. सामाजिक - सांस्कृतिक अलिप्तपणाच्या त्यांच्या निष्ठांवर. परंतु याची जाणीव टीकाकार ठेवीत नाहीत. खरे तर, जनता पक्षातलेच प्रमुख कर्ते लोक संघ-जनसंघाबाबत टीकात्मक बोलत आहेत. महाराष्ट्रातल्या टीकाकार मंडळींनी, वस्तुतः या टीकांचा अंतर्मुख होऊन विचार करावा, हे बरे. आमच्या शहाण्या-सुरत्यांनी अगोदर जनता पक्षातल्या टीकाकारांचे समाधान करावे आणि मगच काही शिल्लक उरल्यास टीकेचे हत्यार परजून माझ्या रोखाने धाव घ्यावी. संघ-जनसंघाला खडे बोल ऐकवणारा एक गट जनता पक्षांतर्गत आहेत ना? माझ्यावर जातीयतेचा आरोप करणारांनी या गटावरील आरोपाचाही उच्चार एकदा केलेला बरा.

वैचारिक श्रद्धांतून काम करणारा मी माणूस. अनेकविध विचारांच्या मंडळींशी संबंध. विविध प्रकारच्या वाचनाची, व्यासंगाची सवय. असा मी, इच्छा झाली, तर जातीयवादी बनणार कसा? सहज ओघात आले, म्हणून हा प्रपंच.

१९७८ च्या प्रारंभाचा हा काळ राजकीय इतिहासाचा, महत्त्वाचा काळ आहे. चार-सहा राज्यांत निवडणुका होणार असून, या निवडणुकांमध्ये, जनता पक्षाच्या राज्यकारभाराच्या, धोरणांच्या अनुभवानंतर जनमताची कसोटी लागणार आहे. काँग्रेस पक्षाला आपल्या ध्येय-धोरणाचा, कार्यक्रमाचा पाठपुरावा करीत-करीत गेल्या वर्षभरातल्या इतिहासाला कलाटणी द्यायची आहे. आपल्या मूळ प्रेरणा आणि काँग्रेसला इतिहासाने दिलेले काम, मनातली तीव्र जाणीव यांच्या आधारावर पक्षाने अधिकाधिक एकसंध बनून जनतेपर्यंत पोहोचावयाचे आहे आणि आव्हान पूर्ण करावयाचे आहे.

काँग्रेस पक्षावर, पक्षाच्या नेत्यांवर टीका या होत राहणारच. परंतु या टीकांचे परिमार्जन करण्यासाठी, लोकांना वस्तुस्थिती पटविण्यासाठी पाच-दहा माणसांच्या संख्येपासून हजारोंच्या संख्येपर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचून नवे वायुमंडळ बनवण्याचे काम केले पाहिजे. खेड्यांपासून शहरांपर्यंत करावयाचे हे काम आहे.

महाराष्ट्र म्हणजे कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे, असे महात्मा गांधी म्हणत असत. म. गांधींनी महाराष्ट्राला जो काँग्रेसचा मंत्र दिला, त्याच्या परीक्षेची, कसोटीची ही वेळ आहे. माझे मन ग्वाही देत आहे की, या परीक्षेत महाराष्ट्र चांगल्या गुणाने उत्तीर्ण होईल.