आमचे मुख्यमंत्री -६५

19  manohar joshi
१९. श्री. मनोहर जोशी

संयुक्त महाराष्ट्राचे अकरावे मुख्यमंत्री
(१४-३-१९९५ ते २५-१-१९९९)

जन्म व शिक्षण

श्री. मनोहरपंतांचा जन्म २ डिसेंबर १९३७ साली रायगड जिल्ह्यातील नांदवी या ठिकाणी झाला. त्यांचे बालपण अत्यंत कठीण परिस्थितीत गेले. त्यांचे शिक्षण नांदवी, महाड, पनवेल येथे वार लावूनच झाले. मनोहरपंत मॅट्रिकला असताना त्यांचे वडील वारले. कॉलेजच्या शिक्षणाकरता ते मुंबईस आले. त्यांनी सर्व शिक्षण नोकरी करूनच पार पाडले. ह्या काळात त्यांना त्यांच्या बहिणीची खूप मदत झाली. ते १९५९ साली रुईया महाविद्यालयातून बी.ए. झाले. १९६१ साली एम.ए. झाले. हे शिक्षण त्यांनी खाजगी वर्गात व महानगरपालिकेत कारकून म्हणून काम करून पूर्ण केले.

व्यावसायिक कारकीर्द

त्यांची व्यावसायिक कारकीर्द १९६१ साली सुरू झाली ती कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटच्या स्थापनेपासून. ही संस्था आता खूप वाढली आहे (शिवसेनेत आजही त्यांना जोशी सर असे संबोधले जाते.) त्यांच्या उद्योगांचे विस्तारीकरणही खूप झाले आहे. त्यांनी ह्या इन्स्टिट्यूटबरोबर हॉटेल बांधकाम ह्या क्षेत्रांतही प्रवेश केला. त्यांच्या मुलाने नुकतीच कोहिनूर मिलची जागा खरेदी केली आहे.
श्री. मनोहर जोशी यांचेशी माझा प्रत्यक्ष परिचय नाही. ते ज्यावेळी विद्यापीठाच्या कार्यकारिणीचे सभासद होते त्यावेळी मी त्या कार्यकारिणीचा सदस्य नव्हतो. दादर मतदार संघातून लोकसभा व विधनसभा ह्यांच्या निवडणुकांत त्यांना अपयश आले. श्री. गायकवाड व त्यांची मुलगी ह्यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. अर्थात तरीही त्यांची विधानसभा व लोकसभा ह्यांतील कारकीर्द संपुष्टात आली असे म्हणता येणार नाही. कारण ते राज्यसभेत शिवसेनेतर्फे सदस्य आहेत. – डॉ. रायरीकर.

मनोहरपंतांची बाळासाहेब ठाकरे यांच्याशी जून १९, १९६६ रोजी श्रीकांत ठाकरे ह्यांच्या मध्यस्थीने ओळख झाली. आज ते बाळासाहेबांचे उजवे हात समजले जातात.

चळवळीत सहभाग

बेळगाव, निपाणी सत्याग्रहात त्यांना जवळजवळ अडीच महिन्यांचा कारावास घडला.