कथारुप यशवंतराव- महामार्ग करायला लागा !

महामार्ग करायला लागा  !

१९५७ साली लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या. यशवंतराव तेव्हा द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री होते. संयुक्त महाराष्ट्रासाठी मराठी जनतेने आंदोलन सुरू केले होते. निवडणुकीच्या प्रचारासाठी पं. नेहरू मराठवाड्याच्या दौ-यावर आले होते.  यशवंतरावही या प्रचार दौ-यात नेहरूंबरोबर मराठवाड्यात फिरत होते. एका संध्याकाळी औरंगाबाद येथे पं. नेहरूंचे भाषण झाले. त्यादिवशी यशवंतरावांची तब्येत बरी नसल्याने ते मुक्कामाच्या खोलीतच होते. पंडितजींच्या भाषणाची टेप नंतर पोलीस अधिका-यांनी यशवंतरावांना ऐकवली. त्या भाषणात नेहरू म्हणाले होते की, ' बहुसंख्य मराठी भाषकांना जर मराठी भाषेचे वेगळे राज्य झाले पाहिजे असे वाटत असेल तर ते त्यांना मिळेलही.' महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा हा पहिला अधिकृत संकेत होता. नेहरूंचे ते भाषण ऐकून यशवंतरावांना खूप आनंद झाला. त्यावेळी सनदी अधिकारी भुजंगराव कुलकर्णी जवळच उभे होते. यशवंतराव त्यांना म्हणाले, ' तुम्ही आता औरंगाबाद - पुणे- मुंबई असा सरळ आणि कमीत कमी अंतराचा महामार्ग तयार करायला लागा. मराठी भाषिक विभागांच्या एकात्मिकरणाच्या आणखी काही कल्पना असतील तर त्याही पटापट मांडायला लागा. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती आता दूर नाही.' त्यानंतर तीन वर्षांनी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. पण यशवंतरावांनी मराठी भाषिकांना एकत्र आणण्याची प्रक्रिया त्यापूर्वीच सुरू केली होती.