कथारुप यशवंतराव-आधी दाढी कर !

आधी दाढी कर !

३१ ऑक्टोबर १९८४ रोजी दिल्लीत इंदिरा गांधींची त्यांच्या शीख अंगरक्षकांनी हत्या केली. देशभर शीखांच्या विरोधात वातावरण तापले. दिल्लीत तर शीखांचे हत्याकांड सुरू झाले. हत्येच्या दुस-या दिवशी डॉ. सतीश देसाई दिल्लीला यशवंतरावांकडे गेले होते. इंदिराजींच्या हत्येने यशवंतराव कमालीचे दु:खी झाले होते.

डॉ. देसाईंचा यशवंतरावांशी विशेष परिचय नव्हता, पण साहेबांनी मनाच्या त्या दु:खी अवस्थेतही त्यांची जेवणाची , राहण्याची व्यवस्था नीट झाली आहे का, याची विचारपूस केली. सर्व सोय झाली आहे असे सांगून डॉ. देसाई जायला निघाले, तेव्हा त्यांना थांबवून साहेब म्हणाले, ' अरे, तू दाढी वाढविलेली आहेस, सध्या दिल्लीत जमाव अनावर झालेला आहे. काहीही घडू शकते. दाढी असताना तू बाहेर पडू नकोस. इथेच दाढी कर आणि मग जा.' त्यांनी लगेच एका नोकराला दाढीचे सामान आणायला सांगितले. डॉ. देसाईंनी यशवंतरावांच्या घरीच दाढी केली आणि ते जायला निघाले, तेव्हा त्यांच्या पाठीवर हात ठेवून यशवंतराव म्हणाले, ' आता जायला हरकत नाही. आता तू बाहेर पडलास तरी मला धास्ती नाही.'

दिल्लीत येणा-या प्रत्येक मराठी माणसाची अशी पुत्रवत काळजी यशवंतराव घ्यायचे. म्हणूनच महाराष्ट्रातून दिल्लीला गेलेल्या मराठी माणसाला दिल्लीतील यशवंतरावांचे घर हे आपले हक्काचे घर वाटायचे.