कथारुप यशवंतराव-तुम्ही महाराष्ट्राची मोठी सेवा केलीय !

तुम्ही महाराष्ट्राची मोठी सेवा केलीय !

कला आणि कलावंत यांच्याबद्दल यशवंतरावांना विशेष प्रेम होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी नाट्यकला, लोककला व त्या क्षेत्रात काम करणा-या लोकांच्या उत्कर्षासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले. पुढे दिल्लीला गेल्यावरसुद्धा त्यांनी ही परंपरा जपली. महाराष्ट्रातील एखाद्या कलावंताने राष्ट्रीय पातळीवर नाव कमावले तर साहेबांना खूप आनंद व्हायचा. ते संबंधित कलावंताला दिल्लीतील आपल्या निवासस्थानी बोलावून त्यांचा सन्मान करायचे.

ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री सुलोचना यांना ' प्रपंच ' या चित्रपटातील भूमिकेबद्दल अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला , तेव्हा त्यांच्या सन्मानार्थ यशवंतरावांनी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी विविध क्षेत्रांतील मान्यवरांना मेजवानी दिली. त्याप्रसंगी यशवंतराव म्हणाले, ' सुलोचनाबाईंनी महाराष्ट्राची फार मोठी सेवा केली आहे.'

यावर सुलोचनाबाई संकोचून म्हणाल्या, ' माझे क्षेत्र अभिनयापुरते मर्यादित आहे. महाराष्ट्राची खरी सेवा तुम्ही केली. मी असे काय केले ?'

यशवंतराव म्हणाले , तुमची भूमिका बघून आपली थोरली बहीण, भावजय, आई तुमच्यासारखी असावी अशी भावना रसिकांच्या मनात उत्पन्न होते.... हीच तुम्ही केलेली सेवा होय. '