कथारुप यशवंतराव-कलाप्रकल्प

कलाप्रकल्प

ना. धों. महानोर हे यशवंतरावांचे लाडके कवी होते. त्यांच्या ' रानातल्या कविता ' वाचून साहेबांना ' कृष्णाकाठ ' आठवायचा. थोर संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी महानोरांच्या अनेक कवितांना अप्रतिम संगीत दिले. स्वत: लतादीदींनी आपल्या अलौकिक आवाजात त्या कविता गायल्या. मंगेशकर परिवाराशी महानोरांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.
एकदा लतादीदी महानोरांना म्हणाल्या, ' मुंबईत एक मोठा कलाप्रकल्प उभारावा असे मला वाटते. आपल्याकडील शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, लोकसंगीत, भावगीत व गायकीच्या क्षेत्रातील अनेक प्रयोग, घटना, गीतकार व गायकांचा इतिहास, रेकॉर्डीग वगैरे जतन करून त्याची मोठी लायब्ररी करावी. तसेच तिथं संगीताचं सगळं शिक्षण दिलं जावं. रेकॉर्डिंगचं अद्ययावत तंत्र व यंत्रसामुग्री शासनाने कमीत कमी किंमतीत लोकांना उपलब्ध करून द्यावी आणि त्याला जोडूनच कला व ललितकला यासाठी हा कलाप्रकल्प सुरू करावा अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी शासनाने बांद्रा परिसरात अर्धा एकर जागा नाममात्र दराने दिली तर फार बरे होईल.'

लतादीदींची ही इच्छा महानोरांनी यशवंतरावांना सांगितली. यशवंतराव तेव्हा केंद्रात मंत्री होते. ते म्हणाले, ' लता मंगेशकर स्वत: लक्ष देऊन हा प्रकल्प करणार असतील तर त्याच्याइतकी चांगली गोष्ट कोणतीही नाही. इतर लक्षावधी लोकांनी हे काम करण्यापेक्षा , लताबाईंनी ते करण्यास फारच महत्त्व आहे.'

यशवंतरावांचा अनुकूल प्रतिसाद मिळालेला पाहून महानोर सुखावले. त्यांनी लतादीदींकडून प्रकल्पाचा लेखी आराखडा मागवला. तो यशवंतरावांना दाखवला. त्यांनी संपूर्ण आराखडा बारकाईने पाहिला व म्हणाले, ' महानोर, मी मुख्यमंत्री असताना १९६० साली रविंद्र नाट्य मंदिराला जी जागा दिली होती. ती त्यावेळी जास्त वाटायची. आज पहा, ती किती अपुरी वाटते. हा कलाप्रकल्प रविंद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतन प्रमाणे सर्वांगसुंदर व्हावा असे मला वाटते. यासाठी तुम्ही शासनाकडे अर्धा एकर जागा न मागता अडीच एकर जागा मागा. लतादीदींनी शासनाला देण्यासाठी जो प्रस्ताव तयार केला होता, त्यावर २० हजार चौरसफूट जागेची मागणी केली होती. त्याच्याच पुढे यशवंतरावांनी महानोरांना एक लाख आकडा टाकायला लावला आणि ' १ लाख २० हजार चौरसफूट जागा शासनाने या प्रकल्पाला द्यावी ' हे सांगण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना फोन लावला.

कलेची कदर करणारे यशवंतराव रसिक तर होतेच, पण त्याचवेळी भविष्याचा वेध घेऊन त्याप्रमाणे पावले उचलण्याची दूरदृष्टी त्यांच्याकडे होती.