कथारुप यशवंतराव-' यशवंतरावांचा आम्हाला पाठिंबा आहे ' असं लिहा !

' यशवंतरावांचा आम्हाला पाठिंबा आहे ' असं लिहा  !

यशवंतरावांनी समाजसेवेसाठी राजकारण केले. विदर्भाकडे त्यांनी जाणीवपूर्वक विशेष लक्ष दिले. विकासाच्या प्रक्रियेत विदर्भ मागे पडू नये याची त्यांनी नेहमीच काळजी घेतली. १९६२ साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर त्यांचा राज्यातील जनतेशी असलेला संपर्क कमी झाला, तरी त्यांनी तो तुटू दिला नाही. नागपूर येथे होणा-या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशना दरम्यान ते आवर्जून विदर्भात जायचे व जनतेच्या अपेक्षा व समस्या जाणून घ्यायचे.

खासदार टी. जी. देशमुख हे विदर्भातील मोठे नेते होते. त्यांचे व यशवंतरावांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. विदर्भासाठी स्वतंत्र कृषी विद्यापीठ स्थापन करावे यासाठी आंदोलन सुरू होते. या आंदोलना दरम्यान अमरावतीत शेतक-यांची तरुण मुले पोलीसांच्या गोळीबारात ठार झाली होती. यशवंतराव त्यावेळी केंद्रीय अर्थमंत्री होते. दिल्लीत या विषयावर त्यांच्याशी चर्चा करताना टी. जी. रागाने म्हणाले, ' विदर्भाचे स्वतंत्र राज्य आम्ही मागत होतो, ते उगीच नाही. आज आम्ही विदर्भातील दहा खासदार एकत्र येऊन कृषी विद्यापीठ विदर्भात झाले पाहिजे असे निवेदन देणार आहोत. आम्हाला ठाऊक आहे, तुम्ही काहीएक बोलणार नाही.'

' टी. जी. , तुम्ही रागात असला म्हणजे तुमच्या वाणीला बहर येतो. पण इतरांना बोलण्याची संधी द्याल की नाही ?'

' तुम्ही हेच म्हणणार की काँग्रेसची शिस्त पाळली पाहिजे व महाराष्ट्राची महान परंपरा जपली पाहिजे' टी. जी. म्हणाले.

' टी. जी. जरा दम खा. माझं उत्तर तुम्ही देऊ नका. विदर्भात कृषी विद्यापीठ झालं पाहिजे, असे निवेदन तुम्ही काढणार आहात ना, मग त्याच्या शेवटी लिहा, यशवंतराव चव्हाणांचा आम्हाला पाठिंबा आहे.'
निवेदनाच्या शेवटी टी. जीं. नी लिहिले की, आमच्या या मागणीस अर्थमंत्री यशवंतराव चव्हाणांचा पाठिंबा आहे. अखेरीस विदर्भात कृषी विद्यापीठ झाले. विदर्भाच्या विकासाला यशवंतरावांचा नेहमीच हातभार लागला.