कथारुप यशवंतराव-मला त्यांना भेटलं पाहिजे !

मला त्यांना भेटलं पाहिजे  !

ज्योत्स्ना भोळे या थोर भावगीत गायिका होत्या. यशवंतराव त्यांच्या गायनाचे चाहते होते. जोत्स्नाताईंचा आवाज त्यांना इतका आवडायचा की १९५८ साली साहेबांवर शस्त्रक्रिया झाली असताना त्यांना त्रास व्हायला लागल्यावर ते म्हणायचे, ' ज्योत्स्ना भोळेंचे ' माझिया माहेरा जा, ' हे भावगीत लावा म्हणजे मला बरे वाटेल.' यशवंतरावांची ही ( नकळत दिलेली ) उत्स्फूर्त दाद कशी काय कोण जाणे, ज्योत्स्नाताईंना कोणीतरी कळविली. त्यांना खूप आनंद झाला. हा त्यांच्या गायनाचा मोठा सन्मान होता.

त्यानंतर खूप वर्षांनी केंद्रीय मंत्री असताना एकदा यशवंतराव लंडनला गेले होते. योगायोग म्हणजे ज्योत्स्ना भोळे या देखील तेव्हा लंडनमध्येच होत्या. लंडनमधील महाराष्ट्र मंडळाने यशवंतरावांचे भाषण आयोजित केले होते. या कार्यक्रमात जोत्स्नाबाईंनी महाराष्ट्रगीत गायले. साहेबांचे भाषण झाल्यावर अनौपचारिक गप्पा मारताना ज्योत्स्नाताई म्हणाल्या, ' तुम्हाला भेटण्याची माझी इच्छा आहे. ' लगेच साहेबांनी सेक्रेटरीला विचारून भेटीची वेळ ठरविली. साहेब तेव्हा जीवराज मेहता यांच्याकडे उतरले होते. ज्योत्स्नाताईंना यायला पाच - दहा मिनिटे उशिर झाला. त्या आल्या तेव्हा जीवराज मेहता त्यांना म्हणाले, ' मॅडम, आपण फार उशिर केलात. आम्ही आता निघालो.'

इतक्यात यशवंतराव बाहेर आले व म्हणाले, ' नाही  नाही, प्लीज, मला त्यांना पाच मिनिटे तरी भेटलेच पाहिजे. त्या महाराष्ट्राच्या श्रेष्ठ गायिका आहेत. ' नंतर त्यांनी ज्योत्स्नाताईंशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.