कथारुप यशवंतराव-अभ्यास कधी सुटता कामा नये !

अभ्यास कधी सुटता कामा नये  !

प्रशासन आणि राजकारण यात समतोल कसा साधावा आणि हे करीत असताना आपले ज्ञान अद्ययावत कसे ठेवावे याचा आदर्शच यशवंतरावांनी घालून दिला. त्यांचा हा आदर्श त्यांच्या पक्षातील आणि मंत्रिमंडळातील सहका-यांनी मात्र घेतला नाही. ही मंडळी वैचारिकदृष्ट्या वाढली नाहीत.

एकदा असेच बोलणे चालले असताना कोणीतरी विचारले, ' आजकाल मंत्री फारशी तयारी करून सभागृहात येत नाहीत असे दिसून येते. तुम्ही यावर काय म्हणाल ?' साहेब म्हणाले, ' शेवटी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मी सांगून पाहतो, विचारले तर सल्ला देतो, मार्गदर्शन करतो. मिळालेल्या संधीचा उपयोग करून न घेणारे दुर्दैवी, दुसरे काय ? मंत्र्यांनी वृत्तपत्रे वाचायला हवीत. त्यातील टिका टिप्पणी वाचून सुधारण्याचा प्रयत्न करायला हवा. आपल्या खात्याच्या फाईली नीट काळजीपूर्वक पाहून अधिका-यांशी चर्चा करायला हवी. असेंब्लीत जाताना तयारी करून जायला हवे, असे ज्युनिअर मंडळींना मी बोलावून सांगतो. काहीजण त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करतात. बाकीचे आपल्या बुद्धीने, आपल्या मार्गाने जातात. नवनवीन पुस्तके वाचणारे, वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंत मंडळींशी संपर्क ठेवून त्यांचे विचार ऐकणारे फार थोडेजण आढळतात. मराठी भाषेवर प्रभुत्व असावे, इंग्रजी व हिंदी भाषा चांगली बोलता यावी असा जाणीवपूर्वक प्रयत्न करणारे क्वचितच आढळतात. ज्ञानलालसा नसेल तर पुढे कसे जाता येईल ?

ज्ञानार्जन आणि अभ्यास कधी सुटता कामा नये. माझी ही बैठक कायम आहे. इतरांचीही असावी अशी इच्छा आहे.'

सर्व काळातील सर्वच राज्यकर्त्यांना हा उपदेश तंतोतंत लागू पडेल यात काही शंका नाही.