कथारुप यशवंतराव-त्याचा प्रेस उभा राहिला पाहिजे !

त्याचा प्रेस उभा राहिला पाहिजे !

श्री. राम निसळ हे अहमदनगरच्या ' आझाद हिंद ' दैनिकाचे संपादक होते. यशवंतराव मुख्यमंत्री असताना एकदा नगर जिल्ह्याच्या दौ-यावर गेले होते. आपण साहेबांना भेटावे असे निसळ यांना वाटले. ते कलेक्टरशी भेटीबद्दल बोलले पण कलेक्टर म्हणाले, ' साहेबांना वेळ नाही. सर्व कार्यक्रम निश्चित झालेला आहे. ' संगमनेर तालुक्यातील एका पाझर तलावाचे भूमीपूजन मुख्यमंत्र्याच्या हस्ते होणार होते. निसळ त्या कार्यक्रमाला गेले. गर्दीत उभे राहिले. खरे तर साहेबांचा व निसळांचा जुजबीच परिचय होता आणि यापूर्वीही एक - दोनदा निसळांनी साहेबांना छापखान्यास भेट देण्याची विनंती केली होती. गर्दीत उभ्या असलेल्या निसळांना पाहून साहेब त्यांना म्हणाले, ' हे बघ, मी आलोय. तुझ्याकडं कधी यायचं बोल. '

' केव्हाही या, पण कलेक्टर साहेब म्हणतात, साहेबांना वेळ नाही.' यावर शेजारीच उभ्या असलेल्या जिल्हाधिका-यांनी पुढील कार्यक्रमांची यादी वाचून दाखवली. पण साहेब निश्चयी सुरात म्हणाले, ' नाही, आपल्याला वेळ काढलाच पाहिजे. उद्या सकाळी पहिली भेट रामकडे.' त्याप्रमाणे दुस-या दिवशी साहेबांनी ' आझाद हिंद ' चा छापखाना पाहिला. निसळांच्या धडपडीचे कौतुक केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर चार वर्षांनी नगरला मुसळधार पाऊस झाला. निसळांच्या छापखान्याची इमारत पडली. त्यांनी साहेबांना पत्र लिहिले, ' तुम्ही ज्या छापखान्याला भेट दिली होती, ती इमारत पावसाने पडली आहे .' पण यापत्राचे उत्तर साहेबांकडून आले नाही. असेच एकदा साहेब नगरच्या दौ-यावर आले असताना निसळ त्यांना भेटले. त्यांना पाहताच साहेब म्हणाले, ' तुझ्या छापखान्याची इमारत पडली आहे. मग तुझं काय म्हणणं आहे ?'

' मला दहा हजारांचे कर्ज मिळवून द्या.' यावर साहेब हसले, जवळच्या एका सहका-याला म्हणाले, ' हा राम मोठा सत्याग्रही माणूस आहे. त्याच्याजवळ कमालीची जिद्द आहे. तो माझ्याविरुद्ध लिहील - त्याचा विचार करायचा नाही. त्याचा प्रेस उभा राहिला पाहिजे.'

यशवंतरावांच्या एका वाक्याने निसळांचे काम झाले. त्यांचा प्रेस पुन्हा सुरु झाला.