कथारुप यशवंतराव-मला नेमाडेंना भेटायचंय !

मला नेमाडेंना भेटायचंय !

सन १९६३ साली भालचंद्र नेमाडे यांची ' कोसला ' कादंबरी प्रकाशित झाली आणि मराठी साहित्यविश्वात खळबळ उडाली. फडके आणि खांडेकरांच्या कादंब-यातील अतिरंजित व स्वप्नाळू जगात रमलेल्या मराठी वाचकांना ' कोसला ' ने एका फटक्यात जमिनीवर आणले. मराठी समीक्षकांना कादंबरीची व्याख्याच बदलावी लागली. यशवंतराव तेव्हा नुकतेच संरक्षणमंत्री म्हणून दिल्लीला गेले होते. ' कोसला ' त्यांनीही वाचली. त्यातील उपहास आणि दांभिकतेबद्दलची चीड त्यांना भावली. नेमाडेंविषयी त्यांना औत्सुक्य व आत्मियता निर्माण झाली.

अशीच काही वर्षे निघून गेली. नेमाडे लिहित राहिले. यशवंतराव राजकारणात आणि लोकांत रमत राहिले. पुढे एकदा यशवंतराव औरंगाबाद जिल्ह्याच्या दौ-यावर आले असताना त्यांना नेमाडेंची आठवण झाली. मराठी कादंबरीला नवे वळण देणा-या या युगप्रवर्तक कादंबरीकाराला आपण भेटावे असे त्यांना वाटले. ते सोबत असलेल्या जिल्हाधिका-यांना म्हणाले, ' भालचंद्र नेमाडे सध्या औरंगाबादमध्येच आहेत ना ? मला त्यांना भेटायचंय. '

नेमाडे तेव्हा मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरातच रहात होते. तो काळ अशांततेचा होता. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठीची चळवळ उग्र बनत चालली होती. विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यावे या मागणीसाठी आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली होती. अशा अवस्थेत यशवंतरावांनी विद्यापीठ परिसरातील नेमाडेंच्या घरी जाणे सुरक्षिततेच्या दृष्टीने धोक्याचे आहे असे जिल्हाधिका-यांना वाटले. पण यशवंतरावांना तर नेमाडेंना भेटायचेच होते. शेवटी जिल्हाधिका-यांनी नेमाडेंना निरोप पाठविला की यशवंतरावजी तुम्हाला विद्यापीठ परिसरातील तुमच्या घरी येऊन भेटू इच्छितात. परंतु सुरक्षा व्यवस्थेवरील ताण कमी करण्याच्या दृष्टीने आपण शासकीय विश्रामगृहावर आलात तर फार बरे होईल. नेमाडेंनी जिल्हाधिका-यांची ही विनंती मान्य केली व ते शायकीय विश्रामगृहावर गेले. यशवंतरावांनी त्यांचे आदरपूर्वक स्वागत केले. त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या. काही वेळाने नेमाडे जायला निघाल्यावर त्यांना निरोप देण्यासाठी यशवंतराव विश्रामगृहाच्या बाहेरच्या फाटकापर्यंत आले. एक राजकारणी एका लेखकाला इतक्या सन्मानाने वागवतो हे पाहून उपस्थित अधिकारी व राजकीय कार्यकर्ते चकित झाले. साहित्यिकांचा सन्मान यशवंतरावांनी नेहमीच जपला. कारण ते स्वत: सुद्धा एक उच्च दर्जाचे साहित्यिकच होते. शब्दांचे सा मर्थ्य त्यांनी पुरेपूर ओळखले होते.