कथारुप यशवंतराव-नाटकासाठी काय पण !

नाटकासाठी काय पण  !

विद्यार्थीदशेत असताना यशवंतरावांना नाटक पाहण्याची आवड निर्माण झाली. शाळेच्या संमेलनात ' माईसाहेब ' या नाटकात त्यांनी कामही केले होते. चांगली नाटके आवर्जून पहावीत असे त्यांना वाटे. एकदा केशवराव दाते यांच्या तत्कालीन महाराष्ट्र नाटक कंपनीचे नाटक कोल्हापूरला आहे असे त्यांना समजले. दाते यांच्या कंपनीच्या ' प्रेमसंन्यास ' नाटकाची जाहिरात यशवंतरावांनी ' नवा काळ ' मध्ये पाहिली. हे नाटक आपण पहायचे असे यशवंतरावांनी ठरवले.  त्यावेळी कराडमध्ये माधवराव घाटगे नावाचे त्यांचे एक मित्र होते. यशवंतरावांनी आपली इच्छा त्यांना सांगितली. सुदैवाने त्या दिवशीच घाटगे गुरूजींचा पगार झाला होता. ते म्हणाले, ' जरूर जाऊया, पण कोल्हापूरमध्ये राहणार कुठं ?'

यशवंतरावांनी पर्याय सुचवला, ' मुक्कामाची गरजच नाही. दुपारच्या सर्व्हिस मोटरने कराडहून निघून संध्याकाळी कोल्हापूरला जायचं. कुठेतरी हॉटेलात चहा-फराळ करून नाटक पाहून झालं की थेट स्टेशनवर येऊन रात्रीच्या गाडीनं कराडला येऊ.'

घाटगे गुरूजींना ही सूचना पटली व दोघे दुपारच्या सर्व्हिस मोटारीने कोल्हापूरला गेले. संध्याकाळी कोल्हापुरात पोहोचल्यावर विचारत-विचारत दोघे पॅलेस थिएटरकडे गेले. दोन तिकीटे घेऊन आत गेले. नाटक सुरू झाले. जयंताची भूमिका करणा-या केशवराव दाते यांचा अभिनय पाहून आपल्या तीन तासांच्या प्रवासाचे सार्थक झाले असे त्यांना वाटले.

रात्री दीड-दोनच्या सुमारास नाटक संपले. आता पुढे काय करायचे ? त्या मध्यरात्री दोघेजण थिएटरपासून चालत रेल्वे स्टेशनपर्यंत गेले. स्टेशनवर विलक्षण शांतता व कमालीची थंडी होती. कराडला जाणारी गाडी सकाळपर्यंत नव्हती. ती रात्र दोघांनी एका बाकावर थंडीने कुडकुडत काढली व दुस-या दिवशी सकाळच्या गाडीने कराडला परत आले. हा सगळा त्रास त्यांनी केवळ नाटक पाहण्यासाठी घेतला !