कथारुप यशवंतराव-समतेचा संस्कार...

समतेचा संस्कार...

सन १९३३ साली ( वयाच्या एकविसाव्या वर्षी ) यशवंताने कराडमध्ये मित्रांच्या मदतीने अस्पृश्य मुलांसाठी शाळा सुरू करायचे ठरवले. या शाळेच्या उदघाटनासाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना बोलवावे अशी यशवंताची इच्छा होती. कारण महर्षीनी आपले उभे आयुष्य अस्पृश्योद्धाराला वाहिले होते. त्यांच्या आशीर्वादाने शाळा सुरू करणे अत्यंत उचित ठरणार होते. पुण्याला जाऊन महर्षी शिंदेंची परवानगी घेण्याची जबाबदारी सर्वांनी यशवंतावर सोपवली आणि महर्षी शिंदे यांच्याशी कसलीही ओळख नसताना यशवंता पुण्याला त्यांच्या घरी गेला. कराडहून आलेल्या या नवख्या मुलाची थट्टा करण्याच्या उद्देशाने महर्षी म्हणाले , ' तू एक साधा पोर; तुझ्या सांगण्यावरून मी कसा येऊ ?'

' आमचा समविचारी मुलांचा ग्रूप आहे. त्या सर्वांच्या वतीने मी आलोय.'

' मी येईन, पण माझ्या काही अटी आहेत.'

' आम्ही सर्व अटी पाळू.'

' कुठं उतरवणार मला ?'

' माझ्या घरीच उतरवणार आहे.'

' घरच्या माणसांची संमती घेतली आहेस ?'

' हो ' यशवंताने दाबून उत्तर दिले.

' माझ्याबरोबर जेवायला गावातील हरिजनांना आणावं लागेल. घरचे लोक मान्यता देतील ?' या प्रश्नावर यशवंताने  ठामपणे उत्तर दिले.. ' हो '.

' घरी कोण कोण आहेत ?'

' आई, थोरले बंधू आहेत , पण ते नाही म्हणणार नाहीत.'

' तुझ्या घरी हरिजनांची  पंगत कधी झाली आहे का ?'

' नाही, पण आपल्याबरोबर ही पंगत कधी झाली आहे का ?'

' नाही, पण आपल्याबरोबर ही पंगत होईल याची मला खात्री आहे. ' महर्षीचा होकार घेऊनच यशवंता कराडला आला. भीत-भीतच त्याने सगळे आईला सांगितले. विठाईमातेने चटकन् होकार दिला. ठरल्याप्रमाणे महर्षी आले. त्यांचे सुंदर भाषण झाले. यशवंताच्या घरी पंगत झाली. महर्षींनी विठाईमातेला याविषयी विचारले, तेव्हा त्या म्हणाल्या, ' मला सारी मुलं सारखीच, त्यात कसली आलीय जातपात ?'