इतिहासाचे एक पान. १६६

महाराष्ट्र आणि गुजरात यांमध्ये झालेले वाद अशाच प्रकारचे होते. वस्तुतः याच दोघांनी देशाला सुरुवातीपासूनच राष्ट्राभिमान शिकवला. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच’ ही लो. टिळकांची मराठी वाणी इथेच प्रथम बाहेर पडली. राष्ट्र-धर्माचा धडा देणारा हा महापुरुष महाराष्ट्रांतच निर्माण झाला. ज्यांना राष्ट्रपिता म्हणून देशानं स्वीकारलं ते म. गांधी गुजरामध्ये निर्माण झाले. आता या दोन प्रांतांतल्या लोकांनी वैरी म्हणून भांडावं की प्रेमानं एकत्र रहावं, असा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा देशाच्या नेत्यांनी निर्णय दिला की, या दोघांनी
भाऊ-भाऊ म्हणून एकत्र राहिलं पाहिजे. उच्च आणि उदात्त पातळीवरून नेत्यांनी हा निर्णय केल्यानंतर, आता हे चार जिल्हे वेगळे, आमचं कांही तरी वेगळं द्या असं कोणी म्हणूं लागलं तर त्याचा अर्थ, त्या लोककथेंतलं रहस्य त्यांना उमगलेलंच नाही, असा करावा लागतो.

राज्य समृद्ध करायचं, उत्पादनक्षमता वाढवायची, उत्पादनाची पद्धति बदलायची, होणारी वाढ समाजामध्ये व्यवस्थित रीतीनं वांटून समाजांतील विषमता कमी करायची, कांही दूरचे आणि कांही नजीकचे प्रश्न होते त्या सर्वांना एकत्र येऊन विचार करायचा यांकडे फार थोड्या लोकांचं लक्ष होतं. यशवंतरावांना त्याचं खरं दुःख होतं. मुंबई राज्यांत सर्वाचं भाग्य आता एक झालं होतं, भविष्य एक ठरलं होतं. एकाचं जें वाईट तें दुस-याचं वाईट आणि एकाचं जें चांगलं तें दुस-याचंहि चांगलं ही स्थिति गृहीत धरूनच कामाला लागणं जरूर होतं.

या दौ-यांत यशवंतरावांनी याच मूलभूत विचारावर जोर दिला. जनतेचं, लोकशाहीचं राज्य चालवण्यासाठी, तें समृद्ध होण्यासाठी, प्रेम व सहकार्य हवं, पण आंधळं प्रेम, आंधळा विश्वास, आंधळं सहकार्य नको असं यशवंतराव जाणीव करून देत राहिले. जें कांही करायचं, ज्याच्याशीं सहकार्य करायचं तें सर्व समजून केलं तरच त्या सहकार्याला अधिक मोल येतं. यशवंतरावांनी या दौ-यांत अशा मोलाच्या सहकार्याची मागणी करतच दौरा संपवला.

आज साता-यांत तर उद्या विदर्भात, परवा गुजरातमध्ये, सौराष्ट्रामध्ये अशी त्यांची भ्रमंती सुरू राहिली. रोज शेकडो मैलांचा प्रवास, जाहीर सभांतून व्याख्यानं, चर्चा, भेटीगाठी, खलबतं, निर्णय आणि पुढचा टप्पा हीच त्यांची दैनंदिनी होती. एका बाजूला नव्या मुंबई राज्याबद्दल जनतेंत आत्मविश्वास निर्माण करण्याची त्यांची पराकाष्ठा होती. तर त्याच वेळीं दुस-या बाजूला, महागुजरात परिषद आणि संयुक्त महाराष्ट्र समिति हे द्वैभाषिकाला कडवा विरोध व्यक्त होत रहावा यासाठी विरोधी चळवळींत हवा भरत राहिले होते.

यशवंतरावांच्या दौ-यानं आणि त्यांच्या बिनतोड युक्तिवादानं राजकीय वातावरण हळूहळू निवळूं लागलं होतं. शांतपणानं विचार करण्याच्या मनःस्थितीला लोक पोंचत आहेत, द्वैभाषिकाला पाठिंबा दर्शवत आहेत अशी परिस्थिति वाढूं देणं परिषद व समिति यांना अर्थातच सोयीच ठरणार नव्हती. कांही महिन्यांवर सार्वजनिक निवडणुका येऊन ठेपलेल्या असतांना परिषद व समितीमधील काँग्रेसविरोधी पक्षांना कृत्रिम विरोध वाढवावाच लागणार होता. निवडणुकींत आपलं घोडं पुढे दामटायचं, तर भाषिक प्रश्नासंबंधीच्या लोकभावनेवर स्वार होऊन काँग्रेसशीं दोन हात करण्यासाठी अशांततेचं, काँग्रेसविरोधाचं वातावरण तापत ठेवणं एवढंच त्यांच्या हातीं उरलं होतं.

यशवंतरावांच्या अहमदाबाद दौ-याचं टिपण साधून विरोधकांनी जाणूबुजून गोंधळाची परिस्थिति निर्माण करण्याचा असचा चंग बांधला. अहमदाबादला १५ डिसेंबर १९५६ ला यशवंतरावांचं भाषण व्हायचं होतं. महागुजरात परिषदेनं ही संधि साधून ‘जनता कर्फ्यू’ चा पुकारा केला. कम्युनिस्ट तंत्राचा अवलंब करून दहशतीचं वातावरण निर्माण केलं. लोकांना सभेस येऊं द्यायचं नाही यासाठी सर्व मार्गाचा अवलंब सुरू झाला. न जाणो, यशवंतरावांचे बोल ऐकूण गुजराती बांधवांमधील मानवता, राष्ट्रप्रेम जागं झालं तर! परिषदेच्या लोकांना ही धास्ती निर्माण झाली असावी.

जनता कर्फ्यूवाल्यांनी, काँग्रेस-जनांवर दगडफेक करून त्यांना चिडवण्याचा, भडकवण्याचा प्रयत्न केला. हेतु हा की, गोंधळ माजून, लाठीहल्ला, गोळीबार इथपर्यंत मजल जांवी. पुढच्या काळांत तेंच भांडवल उपयोगी पडणारं होतं. त्यानुसार विरोधकांनी परिस्थिति पुष्कळ चिघळवण्याचा प्रयत्न केला, पण यशवंतरावांची पकड कायम होती. भावनेवर स्वार होण्याचा त्यांचा बाणा. त्यांनी कुठंहि गोळीबार होऊं दिला नाही. उलट अहमदाबाद शहर काँग्रेसच्या सभेंत त्यांनी ठामपणानं द्वैभाषिकाचं समर्थन करून गांधीजींच्या गुजरातवर अन्याय झाला, तर न्यायच उरणार नाही असं सांगून द्वैभाषिकांत गुजरातला न्यायच मिळेल याची हमी दिली.