यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्त्व-सुसंस्कृत रसिक व्यक्तिमत्त्व-ch २५

२५. मला दिसलेले यशवंतराव (गंगाधर इंदूरकर)

श्री. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र व केंद्राच्या क्षितिजावर वर्षानुवर्ष तळपले.  त्यांचा प्रकाश कधी झळझळीत तर कधी तो मंदावलेलाही दिसला.  पण त्यांचा तारा क्षितिजाच्या बाहेर कधीच गेला नाही.  त्यांच्याच एका मित्राच्या शब्दांत म्हणायचे तर कुस्तीत पराभव झाला तरी त्यांनी ''तालमी''चा आखाडा कधीच सोडला नाही.  त्यांचा माझा परिचय १९६२ साली ते दिल्लीत येण्यापूर्वी थोडा फार होता.  दिल्लीत आल्यानंतर तर पुष्कळच वाढला.  पत्रकार या नात्याने व सार्वजनिक क्षोत्रतील एक कार्यकर्ता या दोन्ही नात्याने.  त्यांच्याच प्रेरणेने स्थापन झालेल्या 'महाराष्ट्र टाइम्स' या मराठी वृत्तपत्राचा मी जवळ जवळ सुरुवातीपासून दिल्लीतील राजकीय घटनांचा आढावा घेणारा प्रतिनिधी होतो, तर सार्वजनिक जीवनात ज्या दिल्ली महाराष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदाची माळ श्री. काकासाहेब गाडगिळांनी १९६४ साली त्यांच्या गळ्यात घातली त्याच संस्थेचा मी त्याच वर्षापासून १९७७ पर्यंत सरचिटणीस होतो.  त्यांच्या राजकीय क्षेत्रातील कार्यप्रणालीविषयी त्यांनी उचललेल्या पावलांविषयी, पत्रकार या नात्याने माझा मतभेद असला तरी दिल्लीच्या सार्वजनिक जीवनातील कामाबाबत मात्र त्यांचा माझ कधीच मतभेद झाला नाही.  सार्वजनिक कार्याबाबत त्यांचा माझ्यावर संपूर्ण विश्वास होता.  मी करीत असलेल्या कुठल्याही कार्यात त्यांनी आडकाठी आणली नाही.  उलट जमेल तेव्हा त्यांनी हातभारच लावला.  मला तर असेही वाटते की राजकीय जीवनात त्यांच्यावर बोट ठेवण्यासारखी जी परिस्थिती निर्माण झाली तिला कारण एकच.  माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला त्यांनी जो विश्वास दिला तो राजकीय जीवनात त्यांच्या वरिष्ठांकडून त्यांना मिळाला नाही, हे आहे.  दिल्लीतील आपल्या वरिष्ठांना त्यांनी नीट ओळखले नाही, आणि ज्या वेळी ओळखले, त्या वेळी त्यांचे पंख इतके छाटले गेले होते की, ते फडफडण्याखेरीज काहीच करूच शकत नव्हते.  मुख्य प्रवाहात राहण्याच्या गोंडस नावाखाली त्यांना प्रवाहपतिताची भूमिका स्वीकारावी लागली.  

यशवंतरावांच्या एका गुणाची न विसरता येण्यासारखी छाप मजवर पडली आहे.  ती म्हणजे त्यांच्या माणुसकीची.  ज्याच्या बरोबर थोडाफार बरा त्यांचा संबंध आला त्याच्या सुखदुःखात आपुलकी दाखविणे हा माणुसकीचा भाग तर आहेच.  भारतीय संस्कृतीचा तो एक अभिन्न भाग आहे.  माझ्या मुलीच्या लग्नाच्या निमित्ताने १९७५ साली आयोजित केलेल्या स्वागत समारंभात श्री. यशवंतरावांची सहकुटुंब हजेरी सर्व प्रथम लागली तर १९७५ साली माझ्या मोठ्या सुनेच्या अकाली मृत्यूनंतर त्यांनी फोनवर का असेना जी सांत्वनपर चौकशी केली, त्याने मी भारावलो.  ही गोष्ट माझ्या मनावर ठसून राहण्याचे आणखी एक कारण होते.  माझा अनेक राजकीय पुढार्‍यांशी चांगला परिचय होता.  अनेकांशी म्हणण्यासारखी जवळीक होती.  पण त्यांपैकी एकालाही माझी चौकशी करण्याची गरज वाटली नाही.  

''दिल्ली दिनांक'' या माझ्या पुस्तकात श्री. यशवंतराव चव्हाणांच्या राजकीय जीवनावर प्रकाश टाकणारे अनेक प्रसंग मी दिले आहेत.  त्यामुळे त्यांची फारशी चर्चा इथे करावयाचे कारण नाही.  पण त्या घटनेमुळे जे निष्कर्ष निघतात त्याचा थोडक्यात आढावा घेणे अप्रस्तुत ठरणार नाही.  वैयक्तिक दृष्ट्या राजकीय जीवनात श्री. चव्हाण यांनी फार मोठी आघाडी मारली.  पार्लमेंटरी सेक्रेटरीपदापासून ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदापर्यंत चढले.  केंद्रात संरक्षणमंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री, परराष्ट्रमंत्री या पण जबाबदार्‍या त्यांनी पुढे पार पाडल्या.  जनता पक्षात फूट पडल्यानंतर श्री. चरणसिंगांच्या कारकीर्दीत ते उपपंतप्रधान देखील झाले.  त्यांची पंतप्रधान होण्याची इच्छा मात्र पुरी होऊ शकली नाही.  ती होती याविषयी माझ्या मनात यत्तिंफ्चितही संशय नाही.  राजकारणात पडलेल्या माणसाची तशी इच्छा असण्यात काही गैरही नाही.  पण हेही तितकेच खरे की त्यांच्या या इच्छेमुळेच राजकारणातील त्यांच्या पायर्‍या वर जाण्याऐवजी खाली येऊ लागल्या.  

व्यक्तीचे मूल्यमापन करण्याऐवजी खाली अगर वर जाण्यास तात्पुरते महत्त्व असले तरी त्यास फारशी किंमत नाही.  तो अगर ती व्यक्ती देशाच्या, समाजाच्या अगर प्रांताच्या जीवनावर कोणता ठसा कायम ठेवून जाते यास खरे महत्त्व आहे.  या दृष्टीने विचार करता यशवंतराव चव्हाणांना अतिशय थोर व्यक्तिमत्त्व लाभूनही समाधान वाटण्यासारखी परिस्थिती लाभली नाही याची खंत वाटते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच त्यांच्या जीवनाचे एक सूत्र होते.  महाराष्ट्रास राष्ट्रीय प्रवाहात कायम ठेवण्याचे.  या दृष्टीनेच सर्व महाराष्ट्र ज्या वेळी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाने पेटला होता, त्या वेळी ते संयुक्त महाराष्ट्रापेक्षा पं. जवाहरलाल नेहरूंना अधिम महत्त्व देत होते.  त्या वेळी त्यांचा निर्णय कदाचित बरोबर ठरला आणि संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणण्याचे श्रेय नंतर त्यांना मिळाले.  राजकीय दृष्ट्या संयुक्त महाराष्ट्र झाला, पण महाराष्ट्र मात्र संयुक्त होऊ शकला नाही.  महाराष्ट्राच्या सर्व भागांच्या मनाची जुळणी करावयास त्यांना वेळच मिळाला नाही.  १९६० साली संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर दोनच वर्षांनी १९६२ साली ते दिल्लीस आले.  महाराष्ट्रातला प्रत्येक भाग विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि दक्षिण महाराष्ट्र आपल्यावर अन्याय होत असल्याच्या भावनेने आज बेचैन आहेत.  ज्या मुंबईसाठी एवढा आटापिटा झाला ती मुंबई राजकीय दृष्ट्या आज महाराष्ट्रात असली तरी मुंबईत महाराष्ट्र आहे किंवा नाही हे सांगता येत नाही असे उद्‍गार श्री. विठ्ठलराव गाडगीळ यांना काँग्रेस पक्षाचे मंत्री असतानासुद्धा काढावे लागले हे फार बोलके आहे.  दिल्लीस आल्यानंतर श्री. यशवंतराव चव्हाणांचे महाराष्ट्राकडे लक्ष राहू शकले नाही असेही म्हणता येणार नाही.  कारण केंद्रात असताना ते दर आठ दिवसांनी महाराष्ट्रात जातच होते आणि यामुळे त्यांचेवर प्रादेशिकतेचा आरोपही दिल्लीत अनेकांनी केलेला मी ऐकला आहे.