यशवंत चिंतनिका ३३

प्रगती व समस्या

एखादी योजना आपण आखतो, ती पार पाडू लागतो, त्या वेळी तिच्या सामाजिक, आर्थिक परिणामांची समग्र जाणीव अनेकदा आपल्यास होत नाही. जसजसे आपण त्या मार्गाने पुढे जातो, तसतसे आपणांस नवे प्रश्न दिसू लागतात. उदाहरणच द्यावयाचे झाले तर शिक्षणाचे देता येईल. शिक्षणाचा अनिर्बंध प्रसार व्हावा, अशा मताचा मी होतो आणि आजही आहे. शेकडो वर्षे निरक्षरतेच्या, अज्ञानाच्या अंधकारात चाचपडणा-या भारताला विज्ञानाचा प्रकाश लवकर दिसावा, ही त्यामागची तळमळ होती. ही विज्ञानाची कवाडे उघडली, प्रकाश आला. आणि त्या मुळे नवा, तंत्रज्ञांचा वर्ग निर्माण झाला. त्यातूनच बेकार तंत्रज्ञांची व शिक्षितांची समस्या आज आपल्यापुढे उभी आहे. एखाद्या वर्गाला पुढचे भवितव्य स्पष्ट दिसले नाही, की तो अस्वस्थ होतो. काही तरी नवा मार्ग शोधतो. शासन अशा वर्गाबाबत थंड व उदासीन राहिले, तर त्या वर्गाच्या असंतोषाला राजकीय स्वरूप येते. हा राजकीय असंतोष एका शैक्षणिक धोरणातून निर्माण झालेला आहे, असे लक्षात येते. समाजातील तंग परिस्थिती अशा अनेक कारणांमुळे निर्माण होते.