यशवंत चिंतनिका २४

विज्ञान व विजिगीषा

निसर्ग जिंकणा-या विज्ञानालाही एक साहसी मन लागते. कल्पकता लागते. अदम्य, अशरण व एक प्रकारची बेगुमान वृत्ती लागते. पाश्चात्त्य राष्ट्रांनी विज्ञानाच्या साहाय्याने ही निसर्ग जिंकण्याची ईर्ष्या सामान्य नागरिकांत निर्माण केली. त्यामुळे तो सारा समाजच जिवंत आहे. उत्साहाने तुडुंब भरलेला आहे. त्याला नावीन्याची ओढ आहे.  काही तरी  शोधणारे व धडपड करणारे मन आणि शरीर ही त्या समाजाची फार मोठी संपत्ती आहे. विज्ञान अशाच समाजात फुलते, फळते.

भारताच्या समाजाचा विचार केला, तर आपणांस या दृष्टीने किती प्रगती करावयाची आहे, हे बुध्दिमंतांना सहज पटेल. भारताला ती साहसप्रियता हवी आहे. पाण्याच्या प्रवाहाला आतून जशी ओढ असते, तशीच ओढ समाजाच्या जीवनप्रवाहात असेल, तर तो संकटांचे पहाड फोडून पुढे जातो. ती त्याला सतत पुढे नेते. समाजजीवनाचे ते गतिशील, बुध्दिनिष्ठ रूप आपणांला दिसावयास हवे आहे. हे रूप आपल्या शिक्षणामधून विद्यार्थ्यांना दिसावयास हवे.