यशवंत चिंतनिका २१

लोकशाहीचे अंतिम उद्दिष्ट

लोकशाहीशी संबंधित असलेल्या प्रत्येक व्यक्तीने, केवळ राजकीय क्षेत्रातच नव्हे, तर सामाजिक व आर्थिक क्षेत्रांतदेखील, लोकांचे समाधान हेच आपले अंतिम उद्दिष्ट मानले पाहिजे. राजकारण आणि प्रशासन या दोन्ही क्षेत्रांतील लोकांचे हेच उद्दिष्ट असले पाहिजे. कारण या दोन्ही क्षेत्रांतील व्यक्ती शेवटी जनतेतूनच आलेला असतात आणि त्यांना जनतेचे भवितव्य घडवून आणण्याचे कार्य करावयाचे असते. राज्यशास्त्र आणि लोकशाहीतील प्रशासन यांना सांधणारा दुवा हाच आहे, असे मला वाटते.

निवडणूक हा लोकशाहीचा एक भाग आहे, आणि लोकशाहीमध्ये निवडणुकीला फार महत्त्वाचे स्थानही आहे यात शंका नाही. परंतु निवडणुकीला किंवा लोकशाहीच्या बाह्य स्वरूपाला जनतेच्या समाधानापेक्षा आधिक महत्त्व नाही. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करीत असा, जनतेचे समाधान हीच अंतिम कसोटी राहील.