यशवंत चिंतनिका २७

दलित साहित्य

दलित समाजातून आलेल्या नव्या मराठी साहित्यिकांनी जे साहित्य निर्माण केले आहे, ती मराठीतील एक मोलाची भर आहे, असे मी मानतो. उच्चभ्रू साहित्याचे किंवा त्याच्या संकल्पनांचे मानदंड लावून त्याला जोखणे चुकीचे आहे. उच्चभ्रू साहित्यात पाश्चात्त्य वळणाची अश्लीलता आपणांला चालते. दलित समाजातून येणा-या साहित्यिकाच्या भाषेस मात्र आपण नाके मुरडतो. हा नैतिक भेदभाव आहे. दुहेरी मानदंडाची भावना त्यामागे आहे, असे मला वाटते. म्हणून ज्या सामाजिक थरातून लेखक आलेला असेल, त्याची भाषा त्याच्या साहित्यात आली, तर ती स्वागतार्ह मानली पाहिजे. शेवटी भाषेचे माध्यम अभिव्यक्तीसाठी वापरावयाचे असेल, तर तिची सामाजिक अभिव्यक्ती हाही एक अविभाज्य भाग आहे. हजारो वर्षे दडपल्या गेलेल्या समाजाचा पहिला उद्गार हा रूढ कल्पनेप्रमाणे असावा, असे मानणे चुकीचे आहे. तो ‘उद्गार’ निघाला, हे सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचे आहे. तो असेल तसा आला पाहिजे. आपण त्याचे स्वागत केले पाहिजे.