मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ५०

५०. साहेबांचे मोठेपण – शंकर खंडू पाटील

एकोणिसशे साठ एकसष्ठ साल असावे. इस्लामपूर येथील काँग्रेस कमिटी समोर कै. राजाराम बापू यांच्या सत्काराची टोलेजंग सभा भरली होती. त्या सभेमध्ये ब-याच लोकांनी काँग्रेस प्रवेश केला. सांगलीचे श्री. कडलास्कर एक गांधी टोपी घेऊन आले आणि म्हणाले, ‘‘मी काँग्रेस प्रवेश करीत आहे. साहेबांनी मला टोपी घालावी.’’ त्या वेळी साहेब म्हणाले, ‘‘मी कधीच कुणाला टोपी घातली नाही.’’ त्यामुळे सर्व सभा हास्यात बुडून गेली.

पुण्याच्या कस्तुरबा मंगल कार्यालयामध्ये साहेबांच्या साडूच्या - दादासाहेब जगतापांच्या मुलीचे - विद्याचे लग्न होते. लग्न समारंभ आटोपला. मुलगा-मुलगी मिरजेला जावयास निघाले. प्रवेशदाराजवळ मोटार उभी होती. चव्हाण साहेबांनी आणि सौ. वेणूतार्इंनी कन्यादान केले होते. आम्ही सर्वजण मोटारीजवळ उभे होतो. साहेब मोटारीजवळ आले नि मुलाचे वडील मामा साळुंखे यांना म्हणाले, ‘‘मुलीला आई नाही. तुम्ही सांभाळा.’’

प्रसंग गंभीर. साहेबांचा दाटलेला कंठ. त्यावर मामा म्हणाले, ‘‘काळजी करू नका. ही माझी मुलगीच आहे.’’ असे म्हटल्यावर त्यांच्या डोळ्यात पाणी आले. साहेबांनी ते पाहिले आणि त्यांनी सौ. वेणूतार्इंकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यातून गंगा-यमुना वाहात होत्या. साहेब सद्गदित झाले नि त्यांनी भावनातिरेकाने मामांना मिठी मारली. आम्हा सा-यांचे डोळे पाणावले.

कोल्हापूरच्या शिवाजी पेठेतील नगर सेवक भिकूशेठ पाटील यांनी कोल्हापूरची मोठी माणसे या पुस्तकाचे प्रकाशन केले. त्या पुस्तकाला त्यांची प्रस्तावना आहे. त्या वेळी बोलताना यशवंतरावजी म्हणाले, ‘‘शिक्षणाच्या निमित्ताने मी कोल्हापूरला चार वर्षे काढली. पुण्यालाही राहिलो. आता अधूनमधून पुण्याला जातो, तसाच कोल्हापूरला येतो. पण कोल्हापूरला आलो की, मला माहेरला आल्यासारखे वाटते.’’ हे वाक्य ऐकताच लोकांनी भारावल्या अंत:करणाने टाळ्यांचा कडकडाट केला.

मिरजेचे सरकारी गेस्ट हाऊस, साहेब, श्रीमती शालिनीबाई पाटलांच्या प्रचाराला आले होते. शालिनीताई पाटील यांनी साता-याची लोकसभेची निवडणूक लढविली होती. त्या वेळी त्यांचेवर अनर्गल टीका केली होती. तेव्हा एका कार्यकर्ताने विचारले.

‘‘साहेब, तुम्ही यांच्या प्रचाराला का आला?’’

‘‘महाराष्ट्रासाठी. दादांसाठी.’’

दोनच शब्द ऐकल्यावर सारे अवाक् झाले.