मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - ५१-१

त्यानंतर सातारला ‘‘न्यू इंग्लिश स्कूल’’ या माझ्या शाळेच्या हीरक महोत्सवाला ते अध्यक्ष म्हणून आले होते. शाळेतील माझी त्यांची औपचारिक भेट आटोपल्यानंतर दुस-या दिवशी सर्किट हाऊसवर गप्पा मारण्यासाठी त्यांनी मला बोलावलं. त्या वेळच्या माझ्या मूर्खपणाचा आणि दादांच्या मोठेपणाचा किस्सा सांगतो, मी कधी त्यांना ‘‘साहेब’’ म्हणे तर कधी ‘‘दादा’’ म्हणे. तर बोलण्याच्या ओघात ज्ञानेश्वरीत सांगितलेला ‘‘हिंसा-अिंहसा-विवेक’’ मी त्यांना समजून सांगत होतो. आणि ‘‘आपण कधीही ज्ञानेश्वरी वाचलेली नाही’’ असा आविर्भाव करून एखाद्या भाविकाप्रमाणे माझ्यासारख्या पोराचं प्रवचन त्या थोरांन पोराहून पोर होऊन ऐकलं होतं. हे मला आजही आठवतं. त्यांचा ज्ञानेश्वरीचा चांगला व्यासंग होता. हे जेव्हा मला पुढं मला कळलं तेव्हा मी मनातल्या मनात दोन-तीन तोंडात मारून घेतल्या. पण हेच यशवंतरावांचं मोठेपण होतं. नेता हा अभिनेता असावा लागतो. असं नुकतेच एक मंत्रिमहोदय माझ्याजवळ बोलले होते. पण नाही, नेता हा रसिकही असावा लागतो. प्रत्येक अभिनेता रसिक असतोच असं नाही. यशवंतराव अभिनेते होते. रसिक होते, त्याचबरोबर धुरंधर राजकारणी होते. म्हणूनच मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र राज्यावर आल्याबरोबर मराठी माणसाचे राजकारणानंतर दुसरे प्रेम नाटकावर असते हे ओळखून प्रथम त्यांनी मराठी रंगभूमीवरचा कर माफ केला आणि मराठी माणसांच्या हृदयिंसहासनावर स्वत:ची जागा त्यांनी संपूर्ण आयुष्यासाठी कायम केली! त्याचे मूळ कारण एकच. ते उदार हृदयी रसिक होते. ‘‘माणूस लेखक होऊ शकतो. अभिनेता होऊ शकतो. पण रसिक होता येत नाही. तो असावा लागतो.’’ हे त्यांच्यामुळे ध्यानात येते.

ज्ञानेश्वरी म्हणते, ‘‘वाचे बरवे कवित्व । कवित्व बरवे रसिकत्व । कारण रसिकत्वि परतत्त्व स्पर्शु जैसा. परतत्त्व स्पर्श म्हणजे दुस-यामध्ये स्वत:ला सामावून घेण्याची शक्ती असणे. त्यामुळे तो तर माझा होतोच, पण मी ही त्याचा होतो ! ही शक्ती यशवंतरावांजवळ होती. त्यांनी मला आपले केले. इतकेच नव्हे तर मलाही त्यांना आपले करायला लावले.

माझ्या वडिलांचा पंचाहत्तरावा वाढदिवस ‘‘वेगळ व्हायचं मला’’ या नाटकाच्या शंभराव्या प्रयोगाच्या वेळी बिर्ला मातोश्री सभागृहात मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते पार पडला. माझ्या वडिलांच्या गळ्यात मुख्यमंत्र्यांनी हार घालावा, हे माझं भाग्य का यशवंतरावांचं मोठेपण! माझा धाकटा मुलगा चि. राजू नऊ वर्षांचा असताना या जगातून गेला. एक महिन्यापूर्वी त्याच्या मुंजीच्या निमित्तानं दादांचा शुभसंदेश आला होता. पण वरील घटनेनंतर काही दिवसांनी त्यांची आणि माझी ‘‘रिव्हिएरा’’ वर गाठ पडली. त्याच्या आदल्या दिवशीच त्यांचं एक चांगलं व्याख्यानं मुंबईत झालं होतं. जिन्यावरून उतरता उतरता ‘‘कालचं तुमचं व्याख्यान चांगलं झालं! बाकी मी काय तुम्हाला चांगलं म्हणायचं म्हणा?’’ असं मी म्हणालो. त्यावर ‘‘असं का म्हणतोस बाबा? हे तरी मला सांगायला कोण येणार आहे?’’ असं म्हणून लगेच... ‘‘तुझा धाकटा मुलगा ना रे?’’ माझ्या पाठीवर हात टाकून लगेच ‘‘मोठा मुलगा आहे ना?’’ देन बकअप ‘‘असं म्हणणारं मोठं माणूस आता मला राहिलं नाही. यापुढचं नाटक लिहून झाल्यानंतर ‘‘यशवंतराव नाटकाला येणार का?’’ हा प्रश्न आता मी कुणाला विचारू?’’ ‘‘राजसंन्यास’’ पृथ्वीवरच राहिला आणि आम्हा सर्व कलावंतांना पोरकं करून रसिकांच्या हृदयसिंहासनावरचा मराठ्यांचा राजा आयुष्याचा संन्यास करून जगातूनच निघून गेला!...